

सिल्लोड : दत्तक घेतलेल्या एका चार वर्षीय चिमुकलीचा आई-बापानेच अंगावर चटके देवून व डोक्यात मारून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आयात शेख फहिम असे आहे. दत्तक घेतलेल्या आरोपीचे नाव शेख फहिम शेख अय्युब (वय ३५ ) तर तिची पत्नी फौजिया शेख फहिम (वय २७ रा अजिंठा हल्ली मुक्काम मोगलपुरा सिल्लोड) असे आहे. घटनेत आरोपी असलेल्या पती-पत्नी या दोन्ही संशयित आरोपींना सिल्लोड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अजिंठा येथील रहिवासी व हल्ली सिल्लोड शहरातील मोगलपुरा भागात राहणाऱ्या शेख फहिम शेख अय्युब, तिची पत्नी फौजिया शेख फहिम यांना चार मुलं असल्याने त्यांनी मुलगी हवी, म्हणून सहा महिन्याआगोदर जालना येथील रहिवासी शेख नसीम अब्दुल कय्युम (वय ३५ ) याच्याकडून कुमारी आयात शेख या मुलीला दत्तक घेतले होते. बुधवारी रात्री या दोघांनी संगनमत करून रात्री मुलीला अंगावर चटके देऊन डोक्यात टणक वस्तूने घाव घालून ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांनी मुलीची हत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबू मुंढे करीत आहे.
मयत आयात या मुलीला त्याचा बाप शेख नसीम अब्दुल कय्युम याने आरोपी शेख फहिम यास पाच हजार रुपयात विकली होती, असे आरोपी याचे म्हणणे आहे. यात जाफराबाद येथील एक इसम मध्यस्थी असल्याचे सांगत मुलीला विकत घेतल्याचे लेखी कागदपत्रे देखील माझ्याकडे असल्याचे आरोपीने सांगितले. मात्र मुलीला का ठार मारले? हे त्याने सांगितले नाही. मुलीला का मारले हे पोलीस तपासात लवकरच निष्पन्न होईल.
मृत मुलगी हिची आई नाजीया फेरोजखाण (वय ३०) व शेख नसीम अब्दुल काय्युम (वय ३५) यांचा विवाह पंधरा वर्षांपूर्वी जालना येथे झाला होता मात्र शेख नसीम यास दारूचे व्यसन असल्याने दोघांचा वर्षभरापूर्वी घटस्फोट झाला होता. नाजीया हिला पाच मुली होत्या, त्यापैकी चार मुली ह्या तिच्याकडे राहिल्या तर सर्वात छोटी मुलगी मयत कुमारी आयात ही तिचे वडील शेख नसीम याच्याकडे होती. नसीम याने कोणत्या कारणाने आयात या मुलीला दत्तक दिले की विकले? हे तपासात स्पष्ट होईल.
मृत मुलीची आई नाजीया व वडील नसीम यांचा घटस्फोट झाल्यानंतर नाजीया हिने दुसरे लग्न जालना येथील फेरोजखान (वय ३४) याच्यासोबत करून घेतले व चारही मुली तिने सोबत ठेवल्या मात्र सर्वात छोटी मुलगी ही तिच्या पहिल्या पतीकडे राहिली. त्याने ती मुलगी दत्तक दिल्याने तिच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली. असे नाजीया हिने सांगितले.
आरोपी पती-पत्नी यांनी मृत आयात हिचा खून केल्यानंतर कोणाला ही बाब समजू नये, म्हणून रात्रीच तिचा अंत्यविधी करण्यासाठी घरातून निघाले होते मात्र आजूबाजूच्या नागरिकांना ही माहिती मिळताच त्यांनी शहर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे सपोनि बाबासाहेब मुंढे हे घटनास्थळी दाखल झाले. मृत मुलीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी जर रात्रीच अंत्यविधी करून घेतला असता तर हा खून एक रहस्यच राहून गेले असते.