

छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील भूजल पातळी मागील पाच वर्षाच्या तुलनेत सुधारली आहे. दरवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील पाणी पातळी सरासरी १ मीटरने वर आल्याचे मार्च महिन्यातील अहवालातून समोर आले आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाने मार्च महिन्यात जिल्ह्यातील ५२ पाणलोट क्षेत्रातील १४१ विहिरींची भूजल पातळी मोजली. भूजल सर्वेक्षणच्या पथकांकडून दर चार महिन्यांनी ही मोजणी केली जाते. मार्च २०२६ मध्ये भूजल पातळी मोजण्यात आली तेव्हा ती ९.४८ मीटर असल्याचे समोर आले. यावरून मागील वर्षीच्या तुलनेत (मार्च २०२५) भूजल पातळीत सरासरी १.०२ मीटरची वाढ झाल्याचे दिसून आले.
जिल्ह्याची मागील पाच वर्षांची भूजल पातळी सरासरी १०.५० मीटर आहे. यावर्षीची ही पातळी ९.४८ मीटर इतकी आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांत भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. खुलताबाद तालुक्यात सर्वाधिक २.८८ मीटर वाढ झाल्याने शेतक-यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
फुलंब्री व वैजापूर या तालुक्यांतही दोन मीटरपेक्षा जास्त सुधारणा दिसून आली. गेल्या वर्षीच्या चांगल्या पावसाळ्यामुळे भूजल पातळीतील ही वाढ झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीही सकारात्मक परिणाम होणार आहे. कन्नड व सोयगावसारख्या तालुक्यांत मात्र शेतकऱ्यांना अद्याप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.