

Chhatrapati Sambhaji Nagar water dispute news
तीसगाव येथील म्हाडा कॉलनीचा पाणीपुरवठा गेल्या दीड महिन्यापासून बंद करण्यात आला आहे. यामुळे महिलांनी असे रिकामे हंडे हातात घेऊन पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी केली.
वाळूज महानगर : तीसगाव येथील म्हाडा कॉलनीचा पाणीपुरवठा गेल्या दीड महिन्यापासून बंद करण्यात आल्याने भर पावसाळ्यात तसेच सणासुदीच्या काळात नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
तीसगाव येथील गट क्रमांक १०४/१ मध्ये म्हाडाच्या वतीने अल्पउत्पन्न गट योजना २००५ मध्ये पूर्ण करून ४५३ गाळेधारकाकांना ते वाटप करण्यात आले आहेत. म्हाडा प्रशासनाच्या नियमानुसार योजनेतील गाळेधारकांमार्फत गृहनिर्माण सोसायटी स्थापन करून ३ महिन्यांत पाणी व्यवस्था तसेच इतर सुविधा हस्तांतरित करून घेणे अपेक्षित होते. सदर योजना २० वर्षे जुनी असूनही येथील गाळेध ारकांचे पाणी व्यवस्थापन म्हाडा मार्फत करून येथील नागरिकांकडून जमा करण्यात येणारी नळपट्टी सिडको प्रशासनाकडे जमा करण्यात येत असे.
दरम्यान एप्रिल २०२४ मध्ये म्हाडा कृती समिती व म्हाडाचे अधिकारी यांच्यात याविषयावर घेण्यात आलेल्या बैठकीत पाणी व्यवस्थापन गाळेधारकांनी सोसायटीमार्फत करावे, असे म्हाडाच्या वतीने सांगण्यात आले होते. तेव्हा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चार महिन्यांत सोसायटी स्थापन करून सुविधा हस्तांतरणाची आश्वासन दिले होते. मात्र या कालावधीत सोसायटी स्थापन न करण्यात आल्याने १ ऑगस्ट २०२४ पासून येथील पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी गाळेधारकांची तथा सोसायटीची राहील, असे पत्र कृती समितीला देऊन म्हाडाने तेव्हापासून येथील नागरिकांची पाणीपट्टी बिल स्वीकारणे बंद केले आहे.
नोव्हेंबर २०२४ पासून सदरील वसाहतीची पाणीपट्टी वसुली बंद असून, नागरिकांकडे जुलै २०२५ पर्यंत एकूण पाणीपट्टी जवळपास १० लाख ५२ हजार ४६३ रुपये इतकी थकीत आहे. येथील नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकल्याने सिडकोने गेल्या दीड महिन्यापासून म्हाडा कॉलनीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. नागरिकांनी थकीत पाणीपट्टी देयक परस्पर आपल्या स्तरावरून सिडको कार्यालयाकडे भरणा करावे, असे पत्र १५ दिवसांपूर्वी म्हाडाच्या वतीने कृती समितीला देण्यात आले आहे.
दीड महिन्यापासून म्हाडा कॉलनीचा पाणीपुरवठा बंद असल्याने मंगळवारी येथील नागरिकांनी बैठक घेऊन पाणीपट्टी संदर्भात चर्चा केली. यावेळी सुरेखा शेळके, वंदना जैस्वाल, मनीषा परगे, संगीता केरे, दीपा पवार, शोभा कवडे, मनीषा निकम मनीषा जाधव, कल्पना वाघमारे, रुख्मिणी सानप, उज्ज्वला देवरे, वैशाली हिवाळे, अजय तळणकर, प्रमोद परळकर, परसराम साठे आदींची उपस्थिती होती.
म्हाडा प्रशासनाकडून येथील रहिवाशांचे पाणीपट्टी देयक स्वीकारणे बंद करण्यात आल्यानंतर गेल्या दीड महिन्यापासून सिडकोने म्हाडा कॉलनीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना नाहक आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
- अजय तळणकर, जिल्हा सचिव युवासेना
म्हाडा व्यवस्थापनाने आजपर्यंत म्हाडा कॉलनीचे हस्तांतरण न करता आठ-दहा महिन्यांपासून म्हाडा कॉलनीचे पाणी बिल स्वीकारणे बंद केले आहे. परिणामी नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकल्याने सिडकोने दीड महिन्यापासून कॉलनीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. म्हाडा व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर येथील पाणीपुरवठा सुरू न केल्यास म्हाडा ऑफिसवर हंडा मोर्चा काढू
शिवाजी हिवाळे, अध्यक्ष म्हाडा कृती समिती, तीसगाव.