

छत्रपती संभाजीनगर : उष्णतेच्या लाटेमुळे शहराच्या तापमानात सातत्याने वाढ सुरू आहे. रविवारी (दि. २६) सूर्य अक्षरशः कोपल्याने कमाल तापमानात रेकॉर्ड ब्रेक वाढ होऊन पारा ४३.४ अंश सेल्सिअसच्या उच्चांकावर पोहोचला. त्यामुळे उन्हाचे असह्य चटके आणि उष्ण झळांमुळे अंगाची लाहीलाही सुरू होती. मागील तीन वर्षांतील एप्रिल महिन्यातील हे सर्वाधिक तापमान असल्याची नोंद हवामान विभागाने केली. दरम्यान, दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.
यंदा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहराच्या तापमानाने चढता क्रम धरला आहे. सूर्य चांगलेच तळपू लागल्याने शहराचे तापमान सलग काही दिवसांपासून ४० ते ४१.०८ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. रविवारी तर उन्हाच्या तडाख्यामुळे सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याचे जाणवत होते. सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाची तीव्रता वाढली. दुपारनंतर उष्णतेची लाट अधिक तीव्र झाल्याने शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये वर्दळ कमी झाली.
उष्ण व कोरड्या वाऱ्यामुळे उकाड्यात आणखी भर पडली. उन्हाच्या असह्य झळा आणि चटक्यांनी शहरवासियांना हैराण केले. त्यामुळे थंडावा मिळवण्यासाठी रसवंतीगृह, शीतपेय, लिंबूपाणी, ताक, फळांचे रस घेताना गर्दीचे चित्र होते. तसेच डोक्यावर टोपी, रुमाल, छत्री यांचा वापर करून नागरिकांनी उन्हापासून बचाव केला.
शहराच्या तापमानाचा आलेख...
वारतापमान (कमाल)
बुधवार ४१.० सेल्सिअस
गुरुवार ४१.०२ सेल्सिअस
शुक्रवार ४१.६ सेल्सिअस
शनिवार ४१.८ सेल्सिअस
रविवार ४३.०४ सेल्सिअस
वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर न पडण्याचा, भरपूर पाणी पिण्याचा आणि हलका आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. आगामी काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन केले.
उष्ण आणि कोरडे वारे मान्सूनपूर्व हंगाम (एप्रिल-मे) या परिणामाला आणखी तीव्र करत आहे. परिणामी, या प्रदेशात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तापमान सामान्यापेक्षा जास्त नोंदवले जात आहे. त्यामुळे वरील परिस्थितीमुळे असलेले सध्याचे उच्च तापमान हे एका नैसर्गिक हवामान घटनेचा परिणाम आहे.