

जे.ई. देशकर
छत्रपती संभाजीनगर: एसटी राज्यभरातील विविध मार्गावर प्रवासी सेवा देत असताना महामार्गावरील टोलचा मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. गतवर्षी एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत छत्रपती संभाजीनगर विभागातील ५१० बससाठी २ कोटी २४ लाख रुपये टोल भरावा लागला होता, यंदा याच कालावधीत बसची संख्या ५ ने घटल्यानंतरही टोलखर्च तब्बल ३ कोटी १९ लाख रुपये झाला आहे. बस कमी होऊनही टोलखर्चात सुमारे २५ लाख रुपयांची वाढ झाली आहे.
एसटी ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत आणि जिल्ह्याबाहेरील लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटीच्या हजारो फेन्या दररोज होतात. या बसेसना राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील विविध टोलनाक्यांवर शुल्क भरावे लागते. त्यामुळे इंधन, देखभाल, कर्मचारी वेतन यांसोबतच टोलखर्चाचाही मोठा आर्थिक भार एसटीचर पडतो. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५ बस कमी असूनही टोलखर्च वाढला आहे. त्यामुळे वाढलेल्या टोलदांसोबतच बसच्या मार्गावरील फेऱ्या, लांब पल्ल्याचे अंतर आणि टोलनाक्यांची संख्या यांचा परिणाम खर्चावर होत आहे.
बस कमी, खर्च मात्र वाढला
गतवर्षीच्या तुलनेत यंदा एसटीच्या बसची संख्या पाचने कमी झाली आहे. मात्र टोलखर्चात जवळपास २५ लाख रुपयांची वाढ झाली. म्हणजेच बससंख्या कमी होणे म्हणजे खर्च कमी होणे, असे समीकरण येथे लागू झालेले नाही. उलट लांब पल्ल्याच्या मार्गावरील वाहतूक, टोलनाक्यांची संख्या आणि टोलदरवाढ यामुळे महामंडळाच्या खर्चावर अतिरिक्त ताण पडला आहे.
प्रवासी सेवेच्या खर्चात टोलचा वाटा
एसटीला इंधन, देखभाल-दुरुस्ती, टायर, कर्मचारी खर्च यासोबत टोलही महत्वाचा खर्च आहे. पाच महिन्यांतच तीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम टोलपोटी खर्च होत असल्याने वर्षभराचा विचार केल्यास हा आकडा मोठा होतो. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात प्रवासी सेवा देणाऱ्या एसटीला टोलमाफी किंवा सवलतीचा धोरणात्मक निर्णय घेतल्यास महामंडळावरील आर्थिक भार कमी होऊ शकतो, असे मत एसटी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.