

छत्रपती संभाजीनगर : दोन दिवसांपूर्वीच न्यू हनुमाननगर चौकात हातात कट्टा, एका हातात बियरची बाटली आणि इतर टोळीविरुद्ध दहशत पसरवण्यासाठी हवेत गोळीबार करून परिसरात दहशत पसरवणाऱ्या गुंडांची पोलिसांनी शनिवारी (दि. १८) त्याच वेळेस, त्याच ठिकाणी धिंड काढली. यावेळी त्या गुंडांच्या हातात कट्टा नाही तर हातकडी होती. परिसरातील हसणारे नागरिक पाहून या गुंडांची हवाच गुल झाली. यावेळी त्यांनी माना खाली घातल्या होत्या.
दोन दिवसांपूर्वी रात्री ९ वाजता हातात गावठी कट्टा आणि बिअरच्या बाटल्या घेऊन पीडी कंपनीच्या नावाने दहशत माजवणारे गुंड शनिवारी त्याच वेळेस आणि त्याच चौकात पुन्हा आले. पण यावेळी त्यांची मान खाली होती, हातात हातकड्या होत्या आणि सोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. तुरुंगातून सुटल्यावर शस्त्रांसोबत रील बनवून भाईगिरी करणाऱ्या या टोळीची दहशत चांगलीच वाढली होती. गोळीबार प्रकरणाची पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गंभीर दखल घेत त्यांच्या त्याच जागेवर धिंड काढण्याची सूचना दिली. त्यानुसार शनिवारी पीडी कंपनीची हनुमाननगरात धिंड काढण्यात आली. हनुमाननगरात हवेत गोळीबार करून दहशत पसरवणाऱ्या गुंडांची धिंड काढली.
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही
शेकडो नागरिकांच्या गर्दीसमोर पोलिसांनी ठणकावून सांगितले की, हे कोणी रीलस्टार नसून सराईत गुंड आहेत. आम्हाला कोणीही काही करू शकत नाही म्हणणाऱ्यांना हा धडा असून, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. ४८ तासांपूर्वी चौकात दहशत निर्माण करणाऱ्या पवन आणि त्याच्या गँगची पोलिसांसमोर आता पूर्णपणे हवा गुल झाली आहे.