

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation has the highest water bill in the state
छत्रपती संभाजीनगर : अमित मोरे
राज्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूर या मोठ्या महापालिका नागरिकांना प्रतिदिन ५ ते ९ रुपयांमध्ये एक हजार लिटर पाणी देतात, तर दुसरीकडे वर्षातून केवळ ४८ दिवसच म्हणजे आठवड्यातून एकदा पाणी देणारी छत्रपती संभाजीनगर महापालिका नागरिकांकडून प्रतिहजार लिटर पाण्यासाठी ४२ रुपये घेते आहे. मागील दहा वर्षांपासून प्रशासनाकडून नागरिकांची लूट होत आहे. तेव्हा राज्य शासन संभाजीनगरकरांची या भुर्दंडातून सुटका करेल का, असा सवाल उपस्थित होत आहे.
केंद्र सरकारने देशातील १०० शहरांना स्मार्ट करण्यासाठी स्मार्ट सिटी योजना सुरू केली होती. यात निवडलेल्या सर्व शहरांचा विकास करून त्यांचा कायापाटल करण्याचा विचार केंद्राचा होता. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आला. त्यानुसार मागील सात वर्षांपासून शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र स्मार्ट छत्रपती संभाजीनगर पिण्याच्या शहराच्या पाण्याची समस्या अजूनही सुटली नाही. शहराला मागील दोन दशकांपासून नियमित पाणीप -रवठाच झालेला नाही. अगोदर दोन दिवसांआड तर मागील चार वर्षांपासून ४ ते ५ दिवसांआड पाणी दिले जात होते अन् चार महिन्यांपासून तर हा पुरवठा तब्बल आठ दिवसांआडवर गेला आहे.
एकीकडे शहरांना दररोज पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व बलाड्या असलेल्या मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे आणि नागपूर या महापालिका वर्षभर पाणी देऊनही नागरिकांकडून २४०० ते ३००० रुपयेच पाणीपट्टी वसूल करते. अन् छत्रपती संभाजीनगर महापालिका मात्र वर्षातील ३६५ दिवसांपैकी केवळ ४८ दिवसच पाणी देऊनही तब्बल ४०५० रुपये पाणीपट्टी वसूल करीत आहे. त्यानुसार राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी घेऊनही संभाजीनगरकरांना आठ दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे. ही एक प्रकारे संभाजीनगरकरांची लूटच असून, यातून राज्य सरकर शहरवासीयांची सुटका करेल का, असा सवाल उपस्थित होत आहे.
दररोज पाणी देत नाही परंतु पाणीपट्टी दररोजच्या पाणीपुरवठ्याची घेतात, अशी ओरड जेव्हा नागरिकांनी केली. तेव्हा मागील चार वर्षांपासून पाणीपट्टी अर्धी म्हणजे घरगुतीसाठी तेथे ४०५० रुपये घेत होते. ते २०२५ रुपये घेत आहे. मात्र राज्यातील इतर मोठ्या महापालिका दररोज पाणीपुरवठा करूनही २४०० ते ३००० रुपयेच पाणीपट्टी वसूल करतात. तेव्हा संभाजीनगरने २०२५ रुपयांपेक्षाही कमी पाणीपट्टी घेणे आवश्यक आहे.
शहरात मागील दोन दशकांपासून नागरिकांना अगोदर दोन दिवसांआड, त्यानंतर तीन दिवसांआड आणि आता पाच ते आठ दिवसांआड पाणी दिले जात आहे. असे असतानाही पाणीपट्टी मात्र नियमितपणे वर्षाला घरगुती ग्रहकांकडून ४०५० रुपये वसूल केली जात आहे.
शहर प्रतीदिन हजार लिटरसाठी
छत्रपती संभाजीनगर ४२ रुपये
मुंबई ६.३६ रुपये
नवी मुंबई ४.७५ रुपये
ठाणे ७.५० रुपये
पुणे ८ रुपये
नागपुर ९ रुपये
नाशिक ७ रुपये