

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात मका, तूर आणि कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे चित्र आहे. जूनअखेरीस मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सातत्याने झालेल्या रिमझिम पावसामुळे खरीप पेरण्यांना गती मिळाली. ३ ऑगस्टअखेर जिल्ह्यात ६ लाख १६ हजार १३८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून, ती सर्वसाधारण ६ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्राच्या ९०.३९ टक्के इतकी आहे.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, यंदा मक्याने नियोजित क्षेत्र ओलांडले आहे. तुरीच्या लागवडीतही मोठी वाढ नोंदली गेली आहे. सोयाबीन आणि कापूस लागवडीचे क्षेत्रही वाढले असून, उर्वरित क्षेत्रावर पेरणी अंतिम टप्प्यात आहे. पुढील काही दिवस पावसाची साथ कायम राहिल्यास पेरण्या शंभर टक्क्यांच्या जवळ पोहोचतील, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
तालुकानिहाय आढाव्यात सोयगाव तालुका ९८.३५ टक्के पेरणीसह अव्वल ठरला आहे. सिल्लोडमध्ये ९६.४४ टक्के, पैठणमध्ये ९५.५१ टक्के, गंगापूरमध्ये ९३.९५ टक्के, तर वैजापूरमध्ये ८८.६१ टक्के पेरणी झाली आहे. संभाजीनगर, कन्नड, फुलंब्री आणि खुलताबाद तालुक्यांतील बहुतांश क्षेत्रावरही खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
यंदा या पिकांना पसंती
मका पिकाखाली २ लाख ३ हजार ६६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, ती नियोजित क्षेत्राच्या १०९.६९ टक्के आहे. तूर पिकाचे क्षेत्र ५९ हजार २८७ हेक्टरवर पोहोचले असून, ते उद्दिष्टाच्या १९०.५७ टक्के आहे. कापूस २ लाख ७६ हजार ७६५ हेक्टर (७१.२८ टक्के), सोयाबीन ४४ हजार १८६ हेक्टर (१५८.९३ टक्के) आणि भुईमूग ८ हजार ११६ हेक्टर (१२७.१४ टक्के) क्षेत्रावर लागवड झाली आहे.