

वाळूज महानगर : मित्रासोबत पळून गेलेल्या अल्पवयीन चुलत बहिणीला समजावण्याच्या बहाण्यानं डोंगरावर फिरायला नेऊन तिला दरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.६) तिसगाव येथील खवड्या डोंगरावर घडला. अल्पवयीन मुलीचा जागीचा मृत्यू झाला. नम्रता गणेशराव शेरकर (१७ वर्ष, रा. शहागड, श्रीराम कॉलनी ता. अंबड जि.जालना) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी पाेलिसांनी ऋषिकेश तान्हाजी शेरकर (वय, २५ रा. वळदगाव ) याला अटक केली आहे. नम्रताचे एका आंतरजातीय तरुणावर प्रेम होते. दोघेही लग्न करणार होते. यातून आपल्या कुटुंबाची मानहानी होईल, या विचारातून चुलत भावाने केलेल्या कृत्याने छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नमृताचे एका तरुणासाेबत प्रेमसंबंध सुरू होते.काही दिवसापूर्वी ती घर सोडून गेली होती. कुटुंबीयांनी समजूत काढून तिला पुन्हा घरी आणले. यानंतर नम्रताला वळदगाव येथे राहणाऱ्या चुलत्याकडे राहण्यास पाठवण्यात आले. सोमवारी (दि. ७) बाहेरून जाऊन येवू, असे म्हणत चुलत भाऊ ऋषीकेश याने नमृताला खवड्या डोंगरावर घेऊन गेला. याठिकाणी तिच्यासोबत गप्पा मारता-मारता ऋषिकेश याने नम्रताला डोंगरावरून खाली ढकलून दिले. सुमारे २०० फुटावरून खाली पडल्याने नम्रताचा जागीच मृत्यू झाला.
ही धक्कादायक घटना तिसगाव येथील खवड्या डोंगरावर घडली. डोंगराखाली क्रिकेटची मॅच सुरू होती. यावेळी क्रिकेटच्या लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येत हाेते. त्यामुळे आरोपी ऋषिकेश हा डोंगरावरुन खाली उतरत असतानाचे लाइव्ह प्रेक्षपणावेळी कॅमेर्यात कैद झाले. पोलिसांनी संशयित आरोपी ऋषीकेश शेरकर यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
१७ वर्षीय नम्रता शेरकर हिचे एका आंतरजातीय तरुणावर प्रेम होते. याला कुटुंबीयांचा विरोध होता. काही दिवसांपूर्वी ती घर साेडून गेली होती. कुटुंबियांनी नम्रताची समजूत काढली. तिला पुन्हा घरी आणलं होतं. ती आंतरजातीय विवाहावर ठाम हाेती. काही दिवसांपूर्वी तिला वळदगाव येथे तिच्या चुलत्याकडे राहण्यासाठी पाठविले होते. नम्रतानेआंतरजातीय विवाह केल्यास आपल्या कुटुंबाची मानहानी होईल, या विचारातून चुलत भाऊ ऋषीकेश शेरकर याने केलेल्या कृत्याने छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरला आहे.
नम्रताचा चुलतभाऊ ऋषीकेश उर्फ वैभव हा गुन्हेगारी प्रवृतीचा असून त्याच्याविरुध्द सातारा पोलीस ठाण्यात मारामाऱ्या करणे, प्राणघातक हल्ले करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये तो हर्सूल जेलची हवा खावून आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.