Chhatrapati Sambhajinagar Flood Alert
छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात नदीकाठची एकूण १६५ गावे पूरप्रवण क्षेत्रात मोडतात. या गावांमधील नुकसान टाळण्यासाठी पावसाळापूर्व उपाययोजनांची कामे १ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बुधवारी मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. जिल्हा नियोजन सभागृहात ही बैठक पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, आपती निवारण कक्षाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, अपर आयुक्त मनपा रणजीत पाटील, डेप्युटी ब्रिगेडीयर कमांडंट ऋषिकेश सुर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के तसेच सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात गोदावरी नदी काठावर निळ्या रेषेखाली येणारी पैठण तालुक्यात १८ तर वैजापूर तालुक्यात १७ व गंगापूर तालुक्यात ८ अशी एकूण ४३ गावे आहेत. पैठण तालुक्यात पैठण शहर, कावसान, दादेगाव- जहांगीर, नायगाव, वडवळी, नवगाव व वैजापूर तालुक्यातील डोणगाव, बाबतारा, लाखगंगा, नांदूरढोक, बाभूळगाव, बाजाठाण या गावांना पुरामुळे वेढा पडतो. तर जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १६, पैठण तालुक्यात १५, फुलंब्री तालुक्यात ७, वैजापूर तालुक्यात ३१, गंगापूर तालुक्यात २६, खुलताबाद तालुक्यात ६, सिल्लोड तालुक्यात १०, कन्नड तालुक्यात ४८ तर सोयगाव तालुक्यात ६ अशी एकूण १६५ गावे ही पूरप्रवण आहेत.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांमध्ये पावसाळ्याच्या आधी जी आपत्ती व्यवस्थापनाची कामे करावयाची असतात त्यात शहरांमध्ये नाल्यांची सफाईची कामे, विद्युत जोडण्या व संयंत्रांची देखभाल, पूरनियंत्रणासाठी करावयाची कामे दि. १ जूनच्या आत पूर्ण करावी. पुराचा धोका संभावणारी गावे, किंवा पुराच्या पाण्याने वेढली जाणारी गावांमध्ये जलशुद्धीकरणाची औषधी, साथरोगांची औषधे, अत्यावश्यक अन्नधान्य साठा इत्यादीची व्यवस्था करून ठेवावी.
तसेच जिल्ह्यातील पुलांचे, धरणांच्या बंधाऱ्यांची देखभाल दुरुस्ती करून घ्यावी. जिल्ह्याची सर्व विभागांची संपर्क व समन्वय व्यवस्था तयार करावी. दि. १ जूनपर्यंत प्रत्येक नियंत्रण कक्ष तयार करून कार्यान्वित करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के यांनी माहितीचे सादरीकरण केले तर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी आभार मानले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडील साहित्य
बोटी - ५
* लाईफ जॅकेट्स १९५,
> बचाव साहित्य किट २१५
* फोल्डिगचे स्ट्रेचर ८१५
बॉडी कव्हर बॅग्ज ८१५
▶ सेफी हेल्मेट्स १३२
प्रकाश योजनेचे १७ संच,
गम बूट जोडे २७६
▶ दुर्बिणी - ५
वीज अटकाव यंत्रणा ७९