

Change the alignment of the Shendra-Bidkin Greenfield project
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शेंद्रा आरिक ते बिडकीन एमआयडीसी पुढे ढोरेगाव या ७०.६० किलोमीटर अंतराच्या या नवीन इंडस्ट्रीयल ग्रीनफिल्ड रस्त्यासाठी राज्य शासनाने दुसऱ्यांदा अलायन्मेंट बदलली आहे. त्यामुळे धरणग्रस्त, डीएमआयसी बाधित असे ४५० शेतकरी पुन्हा तिसऱ्यांदा बाधित होणार असून, नव्याने अलायन्मेंट करा अथवा पहिलीच ठेवा, तसेच एकरी २ कोर्टीचा मोबदला द्या, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि.६) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात आयोजित बैठकीत केली.
यावेळी आमदार विलास मुमरे, कार्यकारी अभियंता शैलेश सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. ग्रीनफिल्डसाठी आता हालचालींना वेग आला आहे. शासनाचे उपसचिव शैलेंद्र बोरसे यांनी जुलैमध्येच या रस्त्याचा पहिला टप्पा कोणत्या भागातून जाणार, याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. या ग्रीनफील्ड महामार्गाच्या भाग १ मध्ये संभाजीनगर डीएमआयसी अंतर्गत करमाड ते बिडकीन या भागाचा समावेश आहे.
सुमारे ३४.८० किलोमीटर अंतराचा हा रस्ता राहणार आहे. तेथून पुढे हा रस्ता पुण्यापर्यंत जाणार आहे. त्यात बिडकीन ते ढोरेगाव असा सहा पदरी रस्ता राहणार आहे. हा मार्ग सुमारे ३५.८० किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गाच्या नव्या अलायन्मेंटवरून आता शेतकरी आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी गुरुवारी (दि.६) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात इंडस्ट्रीयल ग्रीनफिल्डच्या नव्या अलायन्मेंटला सर्वच शेतकऱ्यांनी एकमुखाने विरोध केला. या महामार्गासाठी दुसऱ्यांदा अलायन्मेंट का तयार केली. पहिली अलायन्मेंटच योग्य होती, त्यात आतपर्यंत धरण आणि डीएमआयसीमध्ये बाधित झालेल्यांच्या जमिनी बाधित होत नाहीत.
परंतु नव्याने तयार केलेल्या अलायन्मेंटमध्ये तब्बल ४५० शेतकऱ्यांवर भूसंपादनाची तिसऱ्यांदा कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे नव्याने अलायन्मेंट करण्याची मागणी केली. तर काहींनी अनेकांना या अलायन्मेंटमध्ये वाचविण्यात आले आहे. ज्या शेतीतून वर्षाला १० ते १२ लाखांचे उत्पन्न मिळते, ते कवडीमोल दराने रस्त्यासाठी देणार नाहीत, असे म्हणत काहींनी पहिली अलायन्मेंट ठेवण्याची मागणी केली.
२२०० शेतकरी होणार बाधित
शेंद्रा-बिडकीन-ढोरेगाव या इंडस्ट्रीयल ग्रीनफिल्ड मार्गाच्या भूसंपादनात तब्बल २२०० शेतकरी बाधित होणार आहेत. त्यातील ४०० ते ४५० शेतकरी अगोदरच धरणग्रस्त व डीएमआयसीचे प्रकल्पग्रस्त आहेत.८८ जुनी अलायन्मेंटमध्ये आमच्या शेतीचा काही भागच भूसंपादनात बाधित होत आहे. नव्यामध्ये शंभर टक्के शेती बाधित होत आहे. त्यामुळे जुनीच अलायन्मेंट ठेवा.