

Break on Chikalthana Airport expansion!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या १३९ एकर जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेला स्थानिक प्रशासनाने प्रचंड वेग दिला असला तरी राज्य सरकारच्या पातळीवर मात्र या प्रकल्पाला मअर्थफ्ब्रेक लागल्याचे विदारक चित्र आहे. राज्याच्या ताज्या अर्थसंकल्पात या भूसंपादनासाठी कवडीचीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे अंतिम निवाडा (अवॉर्ड) जाहीर करण्यासाठी निधीची प्रतीक्षा करावी लागणार असून, विमानतळ विस्ताराचे उड्डाण निधीअभावी जमिनीवरच अडखळले आहे.
विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार आणि टॅक्सी रन-वे उभारण्यासाठी चिकलठाणा, मुर्तजापूर आणि मुकुंदवाडी परिसरातील जवळपास ५४ हेक्टर (१३९ एकर) जमीन संपादित करण्यात येणार आहे. यासाठी कलम १९ अंतर्गत अंतिम अधिसूचना नुकतीच राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे सुमारे ७५० शेतकरी आणि मालमत्ताध-ारक प्रभावित होणार असून, संबंधितांना वैयक्तिक स्वरूपातील कलम २१ (१) अंतर्गत नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. मात्र शासनाकडून निधीच न आल्याने शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार, हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
अशी पार पडली प्रशासकीय प्रक्रिया :
प्रारंभिक अधिसूचना: उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी व्यंकट राठोड यांनी ८ जानेवारी २०२५ रोजी कलम ११ (१) नुसार ५८ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचना प्रसिद्ध केली होती.
हरकतींचा निपटारा व मूल्यांकन या अधिसूचनेनंतर आलेल्या ३०० पेक्षा अधिक आक्षेप व हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा करण्यात आला. त्यानंतर वन, भूमिअभिलेख आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बाधित मालमत्तांचे मूल्यांकन पूर्ण झाले. एमएडीसीचा बदल अंतिम अधिसूचनेच्या प्रक्रियेत असतानाच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने प्रस्तावित क्षेत्रात किरकोळ बदल सुचवले. १३९ एकर क्षेत्रातून १.५ एकर जमीन वगळण्यास व दुसऱ्या गटात ०.१६ एकर जमीन वाढविण्याचा प्रस्ताव दिला. या बदलाची प्रक्रिया नव्याने राबवून ती पूर्ण केल्यानंतर आता कलम १९ ची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.
तिजोरीत खडखडाट; ७३४ कोटींची गरज
शासनाने भूसंपादनासाठी आतापर्यंत टप्प्याटप्प्याने ३०४ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी अजून सुमारे ७३४ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या निधीची तरतूद होईल, अशी अपेक्षा होती, मात्र तसे न झाल्याने हा प्रकल्प लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. निधी उपलब्ध होताच अंतिम निवाडा जाहीर करू, असे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
का आवश्यक आहे विस्तार ? सध्या चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी ९ हजार ३०० फूट लांबीची आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि मोठ्या क्षमतेची विमाने शहरात सुरक्षितपणे उतरू शकण्यासाठी ही लांबी किमान १२ हजार फूट करणे अत्यंत गरजेचे आहे. यासोबतच टॅक्सी रन-वे उभारण्यासाठी हे भूसंपादन करण्यात येत आहे. शहराच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासासाठी हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे.