

Batti Gul in the name of repair
सोयगाव, पुढारी वृत्तसेवा : सोयगाव शहरासह तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली तासन्तास वीजपुरवठा बंद ठेवला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दिवसभर वीजपुरवठा खंडित राहूनही समस्या कायम असल्याने महावितरणच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सततच्या वीज खंडित होण्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांना बसत आहे. बँका, तहसील कार्यालय, पंचायत समिती, सेतू केंद्रे आदी ठिकाणची ऑनलाइन कामे वारंवार ठप्प होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शासकीय सेवा वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात आजही जुन्या व जीर्ण वीजतारा, कालबाह्य व धोकादायक खांब तसेच नादुरुस्त रोहित्रांमुळे वारंवार बिघाड होत असल्याचे चित्र आहे. जीर्ण यंत्रणेमुळे वर्षानुवर्षे नागरिकांना वीजपुरवठ्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असून, कोणतीही पूर्वसूचना न देता दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी, वीजवाहिन्यांची तपासणी, रोहित्रांची देखभाल, पोल दुरुस्ती व जीर्ण साहित्य बदलण्याची कामे करण्यात आल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला होता. मात्र, या कामांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी शंका उपस्थित केली असून, देखभाल-दुरुस्तीवर मोठा खर्च करूनही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, व्यापाऱ्यांचे व्यवहार तसेच दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येची तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.