

Approval granted for the privatization of Chikalthana Airport
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रायपूर विमानतळांबरोबरच चिकलठाणा विमानतळाच्या खासगीकरणाला तत्वतः मंजूरी देण्यात आली आहे. खासगीकरणांच्या निविदाप्रक्रियेनंतर याची धूरा कोणत्या कंपनीकडे जाईल ते निश्चित होणार आहे. दरम्यान खासगीकरणानंतर तरी या कागदावर आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या विमानतळाचा विकास होईल का याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. अजिंठा-वेरूळसह विविध पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांची संख्या मोठी आहे. तसेच शहरातील उद्योग, व्यापार आणि शिक्षण क्षेत्राच्या विस्तारासाठी सक्षम विमानसेवा आवश्यक आहे. त्यासाठी विमानतळावरून देशातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या अधिक विमानसेवा सुरू करण्याची गरज आहे.
या बाबत वारंवार विविध मागण्या करण्यात आल्या, परंतु याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे या विमानतळाचा आरंतरराष्ट्रीय दर्जा केवळ कागदांवर राहिला. दरम्यान नुकतेच रायपूर आणि छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा विमानतळाच्या खासगीकरणाला मंजूरी मिळाली असल्याची माहिती विमानतळ सूत्रांकडून मिळाली.
खासगीकरणामुळे विमानतळाचे रूप बदलण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अधिक सुविधा, आधुनिक पायाभूत व्यवस्था आणि विमानसेवांचा विस्तार याकडे आता लक्ष निश्चित दिल्या जाईल. यामुळे विमानतळांची धूरा सांभाळणारी कंपनी किती आणि कोण कोणत्या मार्गावर विमानसेवा वाढवू शकते. त्याच बरोबर मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, पुणे यांसारख्या प्रमुख शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी प्रयत्न होतात का याकडेही येथील प्रवाशांसह व्यवसायीकांचे लक्ष लागले आहे.