

Another accident at that bend in Ajanta Ghats; Truck driver dies on the spot
फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फर्दापूर येथील अजिंठा घाटात अपघातांची मालिका थांबताना दिसत नसून, गुरुवारी (दि.२०) पहाटे ट्रकमध्ये आलेल्या अचानक बिघाडानंतर चालक खाली उतरताच, विरुद्ध दिशेने आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ट्रक चालक जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
मृत चालकाची ओळख व्ही.एम.एम. कुमार मामील्लापल्ली (४९, रा. नेहरूनगर ४ थी लाईन गुंटूरडआंध्रप्रदेश) अशी झाली आहे. हा भीषण अपघात घाटातील ब्लाइंड स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवघड वळणावर घडला आहे. विशेष म्हणजे गेल्या १७ दिवसांत याच वळणावर तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. ३ नोव्हेंबरला ट्रक दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू, १६ नोव्हेंबरला ट्रेलर बिघाडामुळे ४५ तासांची वाहतूक कोंडी आणि आता गुरुवारी पुन्हा एका जीवघेण्या अपघातात ट्रक चालकाचा बळी गेला आहे.
अपघात कसा घडला?
अपघात भल्या पहाटे घडल्याने त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी कोणीही नव्हते त्यामुळे सकाळी ट्रकखाली मृतदेह आढळल्याने ही दुर्घटना उघडकीस आली होती. पहाटेच्या सुमारास व्हि.एम. एम कुमार मामील्लापल्ली यांचा ट्रक (क्र. एपी १६ टिजे ४६६६) जळगाव कडून छत्रपती संभाजीनगर च्या दिशेने जात असतांना.
घाटातील ब्लाइंड स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवघड वळणावर ट्रकमध्ये अचानक बिघाड झाल्याने ट्रक बंद पडला व चालक खाली उतरता क्षणीच विरुद्ध दिशेने आलेल्या अज्ञात वाहनाने ट्रकसह त्यांना जबर धडक दिली. या अपघातात व्ही.एम. एम कुमार मामील्लापल्ली यांच्या डोक्याला व छातीला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक देणारे वाहन मात्र क्षणात पसार झाले. असा कयास लावला जात आहे.
दरम्यान गुरुवारी सकाळी अपघाताची माहिती मिळताच फर्दापूर पोलिस ठाण्याचे पो.कॉ. फिरोज तडवी व योगेश कोळी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत अपघाता मुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करून. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अजिंठा ग्रामीण रुग्णालयात हलवीला. तर वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. डी. खंदारे यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणाची फर्दापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. असून पुढील तपास पोउनि चंद्रशेखर पाटील, पो.ना. निलेश लोखंडे, पो.कॉ. योगेश कोळी यांचे पथक करीत आहे.
खासदार रक्षा खडसे यांचा ताफाही अडकला; नागरिकांनी व्यक्त केला संताप
अपघातानंतर काही काळ घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या खा. रक्षा खडसे यांचा ताफाही या कोंडीत अडकला. परिस्थिती पाहून नागरिकांनी त्यांच्याकडे घाटातील वारंवार अपघात आणि कोंडीची तीव्र समस्या मांडली व घाट रस्त्याचे तत्काळ रुंदीकरण करण्याची मागणी केली.
अरुंद घाटाचा प्रश्न ऐरणीवरच
गेल्या दोन आठवड्यांत तीन गंभीर घटना घडूनही अजिंठा घाटाचा जीवघेणा अरुंद रस्ता अद्याप आहे तसाच आहे. अवघड वळणावरील ब्लाइंड स्पॉटवर अपघाताची मालिका थांबतांना दिसत नसून घाटात वारंवार होणारी वाहतूक कोंडी व अपघात थांबवण्यासाठी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण काही कारवाई करते का या कडे नागरिकांचे लक्ष लागले असून घाट रस्त्याचे त्वरित चौपदरीकरण करण्याची मागणी नागरिकांन कडून करण्यात येत आहे.