

सुमित पवार
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील अजिंठा लेणी येथे मधमाशांच्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या हल्ल्यात तब्बल ९० पर्यटक जखमी झाले असून यात २ विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. गेल्या दोन महिन्यांत ही सातवी घटना असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शुक्रवारी सकाळपासूनच अजिंठा लेणीत मधमाशांचा हल्ला सुरू झाला. लेणी क्रमांक ९, १० आणि २६ परिसरात असलेल्या आगे मोहळातील मधमाशांनी अचानक पर्यटकांवर हल्ला चढवला. दिवसभरात तब्बल ५ ते ६ वेळा हे हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये आंध्र प्रदेशातील सुमारे ३० पर्यटकांसह एकूण ९० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये २ विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे.
घटनेनंतर पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ लेणी परिसरात पर्यटकांना जाण्यास बंदी घातली. जखमींना सुरक्षित ठिकाणी हलवून प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान, गुरुवारीदेखील याच ठिकाणी मधमाशांनी हल्ला केला होता. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मधमाशांच्या हल्ल्यांची मालिका
१८ फेब्रुवारी – ४० पर्यटक जखमी
१९ फेब्रुवारी – ८ पर्यटक जखमी
११ मार्च – ६० पर्यटक जखमी
२१ मार्च – ३० पर्यटक जखमी
३१ मार्च – ११ पर्यटक जखमी
२ एप्रिल – ८२ पर्यटक जखमी
४ एप्रिल – ९० पर्यटक जखमी
गेल्या तीन महिन्यात अजिंठा लेणी परिसरात मधमाशांनी ३२१ पर्यटकांवर हल्ला चढवला असून वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे प्रशासन आणि पुरातत्त्व विभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमकं काय पावलं उचलली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.