

Airport expansion; Farmers are aggressive again
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चिकलठाणा विमानतळ विस्तारासाठी प्रस्तावित भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना न्याय्य भरपाई, पुनर्वसन आणि कुटुंबातील सदस्यांना रोजगार देण्याची मागणी करत विमानतळ विस्तारीकरण कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही समितीने दिला आहे.
समितीने निवेदनात म्हटले आहे की, ७ जून २०२३ रोजीच्या अधिसूचनेनुसार १३९ एकर जमिनीचे संपादन प्रस्तावित आहे. यापूर्वीही अनेक टप्प्यांत भूसंपादन झाले असून, त्या वेळी पूनर्वसन व विकसित भूखंडांसह विविध आश्वासने देण्यात आली होती. मात्र अनेक आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे पुन्हा भूसंपादन करताना शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच परिसरातील जमिनींचे बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यानुसार भरपाई निश्चित करावी, विमानतळ प्राधिकरणात शैक्षणिक पात्रतेनुसार स्थानिकांच्या मुलांना रोजगारात प्राधान्य द्यावे, संपादित क्षेत्रातील रस्त्यांची सुविधा कायम ठेवावी आणि भूसंपादन क्षेत्राची स्पष्ट हद्द जाहीर करावी, अशाही मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. न्याय्य नुकसानभरपाई, पूनर्वसन व पूनर्स्थापना अधिनियम २०१३ नुसारच संपूर्ण प्रक्रिया राबवावी. अन्यथा शेतकरी मागे हटणार नसल्याचा इशारा कृती समितीचे अध्यक्ष बापुसाहेब दहिहंडे, सचिव सदाशिव पाटील दिला आहे.
प्रमुख मागण्या
बाजारभावानुसार नुकसान भरपाई द्यावी
पुनर्वसनाची अपूर्ण आश्वासने तातडीने पूर्ण करावीत
विमानतळ प्राधिकरणात स्थानिकांच्या मुलांना नोकरीत प्राधान्य द्यावे
संपादित क्षेत्रातील रस्ते व संपर्क व्यवस्था कायम ठेवावी
भूसंपादनाची अंतिम हद्द स्पष्टपणे जाहीर करावी