

छत्रपती संभाजीनगर : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला बाहेरून निधी मिळाल्याचा आरोप खरा असेल, तर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अपयश असून त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत केली. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जाचे आदेशही केंद्रीय गृहमंत्रालयातूनच दिले गेले असावेत, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
दिपके यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीमार, दगडफेक आणि पोलिसांच्या कारवाईबाबत पूर्वनियोजन करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तसेच १९ तारखेच्या रात्री आणि २० तारखेच्या सकाळी मी स्वतः पाहिले आहे की, पोलिसांनी दगडांनी भरलेला एक ट्रक आणि आधीच तुटलेली एक व्हॅन तिथे आणून ठेवली होती.
दगडफेकीचे नियोजन पोलिस आणि भाजपने मिळून केले होते. याप्रकरणी आपण थेट डीसीपी यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला, असेही ते म्हणाले. पोलिसांनी संविधानाचे पालन करावे. जर त्यांना भाजपचेच समर्थन करायचे असेल, तर त्यांनी थेट भाजपच्या मुख्यालयासमोर उभे राहून 'मैं भी चौकीदार' म्हणावे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच त्यांनी भाजपवर केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप केला.
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आल्या. त्या केवळ सीबीआय आणि ईडीच्या दबावाखालीच फोडल्या गेल्या, असा दावा केला. तसेच संयुक्त किसान मोर्चासोबत भविष्यातील आंदोलनाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, आंदोलनादरम्यान किसान नेत्यांनी दिलेला पाठिंबा मोलाचा होता.
शेतकऱ्यांना जेव्हा आमची गरज भासेल, तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असे ते म्हणाले. तसेच रामदेव बाबांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या पतंजलीच्या उत्पादनांकडे लक्ष द्यावे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या उत्पादनांबाबत फसवणुकीची नोंद केली आहे, असेही दिपके म्हणाले. तसेच, भाजपमध्ये प्रवेश करा, आंदोलन बंद करा; नाहीतर मारून टाकू, अशा धमक्या आल्याचाही आरोप त्यांनी केला. दरम्यान, गुरुवारी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार बच्चू कडू यांच्यासह विविध संघटनांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी दिपके यांची भेट घेतली.
आता महाराष्ट्रात आंदोलनाची गरज!
महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था ढासळली असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यात आंदोलन उभारणार असल्याचे अभिजित दिपके यांनी सांगितले. निवडणुकांना प्राधान्य देणाऱ्या सरकारला शिक्षणाची चिंता नसल्याची टीका त्यांनी केली. एमपीएससी, टीईटी आणि भरती प्रक्रियेतील प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
बलात्काऱ्यांचे समर्थन करणारे सरकार!
केंद्र सरकार आणि नव्या शिक्षणमंत्र्यांवरही दिपके यांनी नाराजी व्यक्त केली. देशाचे शिक्षणमंत्री आता बलात्काऱ्यांचे स्वागत आणि कौतुक करत आहेत. प्रधान यांना हटवून सरकारने आणखी एक विचित्र माणूस त्या पदावर बसवला आहे. हे सरकार बलात्काऱ्यांचे समर्थन करणारे आहे, अशी टीका त्यांनी केली. सध्या झेन झी पिढीला जाणूनबुजून ट्रोल केले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.