छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घराला कुलूप लावून मूळ गावी झारखंडला गेलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य व्यवस्थापकाचे घर फोडले. चोरट्यांनी ७ तोळे सोने, ३५० ग्रॅम चांदी आणि ३५ हजार रुपये रोकड असा ४ लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना ४ नोव्हेंबरला उघडकीस आली होती. मात्र, फिर्यादी शहरात नव्हते, त्यामुळे १९ नोव्हेंबरला या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणधीर विन्देश्वरी प्रसाद (वय ४३, रा. साई सागर हौसिंग सोसायटी, एन-१, सिडको) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रणधीर प्रसाद बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत मुख्य व्यवस्थापक आहेत. २१ ऑक्टोबरला ते कुटुंबियांसह मूळ गावी मधुपूर (ता. देवघर, झारखंड) येथे गेले होते. त्यांनी घराला कुलूप लावले होते. ४ नोव्हेंबरला त्यांच्या मोलकरणीने घराचे कुलूप तुटलेले आहे, अशी माहिती प्रसाद यांना दिली होती. तेव्हा त्यांनी तिला घराला तात्पुरते कुलूप लावण्यास सांगितले. त्यानंतर ९ नोव्हेंबरला प्रसाद हे शहरात परतले. त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले दिसले. कपाटांची पाहणी केल्यावर दोन तोळ्यांच्या दोन चेन, अडीच तोळ्यांचे दोन मंगळसूत्र, दीड तोळ्यांच्या चार अंगठ्या, एक तोळ्याच्या चार बाळ्या, असे सात तोळे सोन्याचे दागिने, २०० ग्रॅमच्या चांदीच्या पैंजणचे तीन जोड, ५० ग्रॅमच्या चांदीच्या दोन चेन, १०० ग्रॅमच्या चांदीच्या वाट्या, ग्लास, चमचा आदी आणि ३५ हजार रुपये रोकड असा जवळपास ४ लाखांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात तक्रार दाखल केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
हेही वाचा