छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चिकलठाणा कचरा प्रक्रिया केंद्रात साचलेल्या कचऱ्यावर पाऊस पडल्याने त्यातून निघणारे दुषित पाणी मनपाने थेट नाल्यात सोडले. हे पाणी नाल्यातून परिसरातील शेतीपिकात वाहून गेले असून k\mमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. २) मनपाच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला कुलूप ठोकले. तसेच याबाबत सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणि प्रदुषण नियंत्रण बोर्डाकडे प्रशासनाची तक्रार दाखल केली आहे.
नारेगाव येथील शेतकरी व नागरिकांच्या प्रचंड विरोधामुळे ७ वर्षांपूर्वी मनपाने येथील कचरा डेपो बंद केला. त्यानंतर शहराच्या चारही दिशेला चार कचरा डेपो तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यात चिकलठाणा, पडेगाव, हर्सुल आणि कांचनवाडी येथे जागेचा शोध घेऊन कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आले. परंतु, यात कांचनवाडीमध्ये केवळ ओल्या कचरावरील प्रक्रिया प्रकल्प असून उर्वरीत तीन ठिकाणी सुक्या कचरावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात आले आहे. मात्र, त्यातील हर्सुलचा केंद्र अद्यापही सुरू नसल्याने संपूर्ण शहरातील सुका कचरा पडेगाव आणि चिकलठाणा केंद्रातच डंप केला जात आहे. या कचरा प्रक्रिया केंद्रात मोठ्याप्रमाणात कचऱ्याचे ढिग साचले आहे.
मनपाने प्रक्रिया करून कचऱ्याचे खतात रुपांतर केले. परंतु, तयार होणाऱ्या खाताच्या तुलनेत विक्रीचे प्रमाण अत्याल्प असल्याने कचरा डेपोमध्ये कचऱ्यासह खताचे डोंगर उभे राहिले आहे. मागील दोन आठवड्यांपासून शहरात दमदार पाऊस सुरू आहे. कचऱ्यावर पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून डेपो बाहेर जाऊ नये, यासाठी मनपाने डेपोमध्ये हे पाणी साठविण्यासाठी मोठ्या क्षमतेचा हौद तयार केला आहे. परतु, दमदार पावसामुळे कचऱ्यातून निघणाऱ्या पाण्यामुळे हौद देखील पूर्णपणे भरला आहे. त्यातून काळे दुषित पाणी ओव्हरफ्लो होणे सुरू झाल्याने ते पाणी पंपींगद्वारे नाल्यात साडण्यात आले. हे पाणी वाहून परिसरातील शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी डेपोलाच कुलूप ठोकले.
—-
गुन्हा दाखल करण्याची धमकी
पिकाचे नुकसान झाल्यामुळे मनपाच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला कुलूप ठोकले. त्यामुळे मनपा अधिकाऱ्यांनी आम्हाला गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे आम्ही सर्वांनी मनपा अधिकाऱ्यांच्या या कृत्याविरोधात सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनाम देखील केला आहे. 'तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळाकडेही तक्रार केली आहे.
निलेश कवडे, शेतकरी
—
२० गुंठ्यातील गोबीचे नुकसान
काळ्या दुषित पाण्यामुळे परिसरातील एका शेतकऱ्याने २० गुंठ्यात लावलेल्या गोबी पिकाचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. पावसामुळे पिकाला जिवनदान मिळाले. परतु, मनपाच्या कचरा डेपोतील दुषित पाण्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याची ओरड शेतकऱ्याने केली. याशिवाय इतरही शेतातील पिकाचे नुकसान झाले आहे.