

Vadwani, Ashti, and Kaij Hit by Unseasonal Rains
बीड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील वडवणी, केज व आष्टीसह इतर काही तालुक्यांना अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिला. यामध्ये शेतीपिकांबरोबरच आंबा व इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर चडवणी तालुक्यात वीज पडून गाय ठार झाल्याची घटना घडली.
वडवणी तालुक्यातील चिंचवण, खडकी, देवळा, सोत्राखोटा, कोठारबन, ढोरवाडी, पिंपरखेड आदी गावांमध्ये गारांचा पाऊस झाला. काही ठिकाणी मोठ्या आकाराच्या गारांमुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गह, ज्वारी, हरभरा, कांदा यांसह आंबा व मोसंबी फळबागांना सर्वाधिक फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
विशेषतः काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके गारांच्या तडाख्यामुळे जमीनदोस्त झाली आहेत. आंबा बार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली असून बागायतदारांचेही मोठे नुकसान झाले आहे. कांदा व हरभ-याच्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना, या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे दुहेरी संकट ओढवले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
दरम्यान, या पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांतही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली असून शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
केज तालुक्यात गारपीट
केज तालुक्यात दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तालुक्यातील काही गावांतील आंबा, भाजीपाला, फळभाज्या आणि गहू ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. १९ मार्च, गुरुवार रोजी दुपारी ४:३० तुकुचीवाडी, कोल्हेवाडी, लव्ही, काशीदवाडी, नागझरी, येवता, कोठी, पन्हाळवाडी या गावांच्या शिवारात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली.
या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले असून छोट्या कैप्ऱ्या आणि मोहोर गळाला आहे. तसेच कापणीला आलेला गहू, ज्वारी आणि कापणी करून मळणी करण्यासाठी कापणी केलेले पिके भिजली आहेत. तर फळभाज्या आणि पालेभाज्या या पिकांना अवकाळी पाऊस व गारपीट यांचा मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिके गेल्याने पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे.
आष्टी तालुक्यालाही झोडपले
अवकाळी पावसाबरोबरच गारपिटीने आष्टी तालुक्यालाही झोडपले आहे. आष्टीच्या काही भागात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान झाले असून आंबा व इतर फळबागांचेही नुकसान झाले आहे.