

बीड : गजानन चौकटे
हिंदु संस्कृतीमध्ये होळी, धुलिवंदन हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. तर बंजारा समाजामध्ये या सणला अनन्यसाधारण महत्व आहे. एक महिण्यापासून या सणाची जय्यत तयारी बंजारा समाजातील महिला, पुरूष करतात. शहरी भागासह ग्रामीण भागात होळी, धुलिवंदन सणाला एक वेगळे महत्व आहे. धुलिवंदन साजरी करण्याची बंजारा समाजामध्ये एक वेगळी परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून ही परंपरा आजतागायत सुरू आहे. या सणाला नातेवाईक व मित्रपरिवार एकत्र येउन आनंदाने हा सण साजरा करतात.
काकी ये दीदी रसमत करजो होळी बोलच ये भांड, आजी काकी तुम्ही रागवू नका होळीचा आम्हाला भांडायला सांगते असा याचा अर्थ होतो. त्याप्रमाणे बंजारा समाजामध्ये होळीला, दिवाळीला व नागपंचमीला घरचा पितुरांना मनोभावे पूजले जाते. होळी निमित्त सकाळी वळवट व भात करून शुद्ध तुपामध्ये अग्नी मध्ये देऊन पूजन करतात त्यास आपकार असे म्हणतात. याचा अर्थ चुलीमधे अग्नीला घास देणे असा होतो. बंजारा समाजामध्ये होळीला महत्त्वाचा सण मानला जातो. बंजारा समाजामध्ये होळी सण पंधरा दिवस अगोदरच साजरा केला जात असतो. त्याची लगबग दिसून येत असते. आज होळीनिमित्त घरोघरी सण साजरा केला जात असतो. बंजारा समाजामध्ये याला खूप महत्त्व आहे. तांड्यामध्ये पुरुष व स्त्रिया होळी खेळायला सुरुवात करतात. महिला व पुरुष वेगवेगळे ताल धरून नाचत असतात. पंचवीस वर्षांपूर्वी होळी सणानिमित्त गावच्या वाटेवर अथवा इतर गावांमध्ये जाऊन गेर मागतात. म्हणजेच पैसे मागतात. पण आता ही प्रथा हळूहळू लोप पावत आहे. गावामध्ये गेर मागतात. नवीन मुलगा जन्माला आल्यास त्याचा शोध घेतात. त्याला धुंड असं म्हणतात. अशा मुलाचे घर शोधून त्याच्या घरासमोर जाऊन गाणे म्हणत होळी खेळतात व आनंद उत्सव साजरा करतात.
त्यानंतर त्या मुलाचे वडील सर्वांना जेवण देत तसेच या समाजात मागच्या वर्षीच्या काळत घराच्या पुरुष अथवा कुणी लोक मरण पावले असतील त्या घरासमोर जाऊन गाणे म्हणून होळी खेळतात. म्हणजेच त्या घरच्या माणसांचं एक प्रकारे सांत्वन केले जातं. गावोगावी होळी सायंकाळी सात वाजता पेटवली जाते, पण बंजारा समाजामध्ये होळी सकाळी चार वाजता पेटवली जाते. या समाजामध्ये सकाळच्या शुक्राची चांदणी निघते त्या वेळी होळी पेटवली जाते.
विशेष म्हणजे गावातील पेटविलेल्या होळीचा विस्तव घेऊन मुले रात्री घरी जातात व त्या विस्तवाने चार वाजता होळी पेटवली जाते. सार्वजनिक ठिकाणी एरंडीच्या झाडाला आग लावली जाते. यावेळी महिला मुलांना आग लागू देत नाहीत. त्यामुळे एरंडाची दांडी घेऊन पळतात. त्यास दांडी काढणे म्हणतात. होळीच्या आजूबाजूला बायका मुली होळी खेळत विविध गाणी म्हणतात. त्याच वेळीचे गाणे म्हणजे होळी आई होळी डगर चालिये या गाण्याने सणांची सांगता करतात.
असे म्हणतात की, ज्याप्रमाणे गणपती उत्सवाला निरोप देताना काही गाणे म्हणतात. त्याचप्रमाणे होळी आई होळी म्हणजे होळी झाल्यानंतर अखेरचे गाणं म्हणतात. असा विविधतेने नटलेल्या बंजारा समाजाचा अत्यंत जिव्हाळ्याचा मानलेला सण म्हणजे होळी. आनंद उत्साहाने आज गेवराई तालुक्यामध्ये साजरा होताना आपल्या पाहायला मिळत आहे.
अनेक वर्षांपासून रूढी परंपरानुसार हा सण चालत आलेला आहे. आज देखील बंजारा समाज एकत्र येत मोठ्या गुण्यागोविंदाने पारंपरिक गाण्यांच्या तालावर हा सण साजरा करत असतो. आज देखील पूर्वी प्रमाणेच सणाचं महत्व जपवून आहेत. बंजारा समाजामध्ये या होलिकोत्सवाकरीता महिला, बंजारा, लेंगी असे वेगवेगळे गित सादर करतात. गाण्यामधून परंपरा चालत आलेल्या रितीरिवाजाची जपणूक करण्याबरोबरच सामाजिक सलोखा ठेवण्याचा संदेश दिला जातो.
प्राध्यापक पी.टी चव्हाण
सामाजिक कार्यकर्ते
होळी एकत्र आणते
बालपणी २०-२० किलोमीटरची पायपीट करून सणाला घरी यायचो. बंजारा समाजातील बाहेरगावी नोकरीला असलेल्या लोकांना एकत्र घेऊन येणारा सण म्हणजे होळी. आधुनिक काळातही गावाकडची मंडळी ही परंपरा जपत आहेत. प्रथा अशीच कायम राहावी अशी अपेक्षा.
अशोक राठोड