गेवराई : कामावरून गावाकडे परत चाललेल्या दोन कामगारांच्या अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल (दि.24) गेवराई तालुक्यात घडली.
बाबुराव सुर्यभान पिंपळे(वय २७) व लहू उद्धव खरात (वय ३२), (दोन्ही रा.अर्धमसला ता गेवराई जि.बीड) अशी मृतांची नावे आहेत. हे दोन्ही युवक नामलगाव येथील चारचाकीच्या शोरूममध्ये काम करत होते. मंगळवारी (दि. २४) बाबुराव पिंपळे व लहू खरात सायंकाळी उशिरा कामावरून गावाकडे दुचाकीवरुन परत येत असतानाच पाऊस अन् विजेचा होणारा कडकडाट सुरु असल्याने ते सोलापूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील हिरापुर जवळपास थांबण्यासाठी निवारा शोधत होते. यावेळी दोघांच्या अंगावर वीज कोसळली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही युवकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीस बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.