

केज : संतोष देशमुख यांच्या नावासमोर 'शहीद' हा शब्द लागू शकतो. त्यांचा जो बळी गेलाय, तो एका प्रवृत्तीच्या विरोधात गेला आहे. त्या प्रवृत्तीला नष्ट करण्याचा विडा आपण सर्वांनी उचलायला हवा, त्यामुळे काँग्रेसच्या वतीने सद्भावना पदयात्रा काढण्यात आली सांगून भारताच्या डीएनएमध्ये आणि भारताच्या संविधानामध्ये देखील सद्भावना असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. तसेच भाजप हा खोके बोके आणि आक्का यांना जन्म देणारा कारखाना असल्याची सणसणीत टीका त्यांनी भाजपवर केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात काँग्रेसच्या वतीने मस्साजोग ते बीड अशी दोन दिवसांची सदभावना पदयात्रा काढण्यात येत आहे. या रॅलीची सुरुवात संतोष देशमुख यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहून करण्यात आली. तसेच छ्त्रपती शिवाजी महाराज चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महापुरुषांना अभिवादन करून सद्भावण्याची शपथ घेतल्यानंतर ही यात्रा रवाना झाली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसच्या नेत्या खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील, प्रा. सुशीला मोराळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, दत्ता बारगजे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांच्यासह संतोष देशमुख यांची कन्या वैभव देशमुख मुलगा विराज देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख हे देखील यात्रेत सहभागी झाले होते.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ज्या विचारांचे आपण पाईक आहोत. ती शुद्ध भावना आमच्या मनात आहे. ही घटना घडल्यापासून देशमुख कुटुंबीयांचा व त्यांच्या कन्येचा बोलताना कुठेही तोल गेलेला नाही. त्यांनी सातत्याने विवेकपूर्ण विचार सर्वांसमोर मांडला आहे. विवेकवादी म्हणून ते आपल्या सर्वांच्या समोर आले आहेत. या परिवाराने सद्भावना जोपासली आहे. त्यांनी कोणत्या धर्माला, कोणत्या जातीला नावे ठेवलेली नाही. त्यामुळे वाईट प्रवृत्ती विरोधात आपण सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. राज्यात रोज वेगवेगळ्या घटना घडत आहेत. त्यामुळे आपला समाज बधीर झालाय का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपण साधू संतांचे, महापुरुषांची नावे घेतो. संविधानाचे नाव घेतो, त्यावेळी सर्वांची शिकवण ही सद्भावनाच असल्याचे आपल्या लक्षात येते. या सद्भावण्याच्या विरोधात कोण आहे ? याचा थोडा विचार केल्यास फोडा-तोडा आणि राज्य करा, प्रवृत्ती या विरोधात असल्याचे दिसते. ही प्रवृत्ती आज जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ही ते म्हणाले.
संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्ह्यातील वातावरण खराब झालेले आहे. ते पूर्ववत व्हावे म्हणून ही सदभावना यात्रा काढण्यात आलेली आहे. सर्वांनी एकत्र यावे आणि यात कुठलाही भेदभाव राहू नये. ही आमची भावना आहे. या हत्या संदर्भात बोलताना खा. रजनीताई पाटील म्हणाल्या की, ज्यावेळी संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यावेळी पोलिसांचा वचक नव्हता. कारण ६ डिसेंबर रोजी जर त्यांनी गुन्हा दाखल करून त्याची दखल घेतली गेली असती. आरोपींवर कारवाई झाली असती तर कदाचित ही घटना देखील घडली नसती. जे लोक शक्तीचा, पैशाचा, ताकदीचा आणि राजकारणाचा दुरूपयोग करून सामान्य लोकांना दाबण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्याला कायद्याचा धाक बसवायलाच हवा. अशी भावना खा. रजनीताई पाटील यांनी व्यक्त केली.