

The non-veg Kanduri Thali trade has become popular.
मनोज गव्हाणे
नेकनूर, पुढारी वृत्तसेवाः बोकड ढवारा जेवण, चुलीवरचे कंदुरी मटण, भाकरी, स्पेशल थाळी, यावच लागतय, नाद करती काय या हॉटेलच्या पाट्या वाटेवर अलीकडे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असून त्या लक्ष वेधून घेत आहेत. धाराशिव जिल्ह्यातून लोकप्रिय ठरलेला हा नॉनव्हेजचा ट्रेड बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पॉप्युलर बनला आहे. हॉटेल व्यवसायासाठी चालना देणारा हा थाळी पॅटर्न खवय्यांच्या खिशाला ही परवडेबल असल्याने कॉलिटी आणि क्वांटिटी सांभाळणाऱ्या हॉटेलमध्ये दिवसाकाठी कुठे एक, कुठे दोन, तीन बोकडांचा फडशा पडताना पाहायला मिळतो.
मांसाहार करणाऱ्यांची वाढती संख्या आणि मटणाचे वाढलेले दर हे गणित ओळखून धाराशिव जिल्ह्यात काही हॉटेल चालकांनी थाळी पॅटर्न राबवला याला मिळालेला प्रतिसाद पाहता हा ट्रेंड अनेक ठिकाणी रुजला आणि बघता बघता प्रत्येक हॉटेलच्या पुढे बकरे कापण्याची पद्धत सुरू झाली. याच बरोबर बकऱ्याचे कंदुरी मटण, ढवारा जेवण, चुलीवरची भाकरी, स्पेशल थाळीचे बोर्ड लावले गेले आणि खवय्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या चुलीवर शिजू लागल्या.
कोणाकडे अनलिमिटेड भाकरी सोबत अंडे तर कोणाकडे पाणी बॉटल, राईस फ्री असा फंडा राबवला जात आहे. मटन थाळी २५० रुपये, चिकन, मच्छी थाळी २०० रुपयाचा सेम रेट सर्व ठिकाणी दिसून येतो यामध्ये भाकरी आणि रस्सा खवय्यांना अनलिमिटेड दिला जातो. एकत्रित सूप मध्ये भाजी बनवली जात असल्याने ती जत्रा, कंदुरी प्रमाणे चविष्ट बनली जाते यामुळे ग्राहकांना ती भावली आहे यामुळेच अनेक हॉटेल चालकांना ग्राहकांच्या मागणीनुसार स्वतःला अपडेट करावे लागले आणि हा थाळी ट्रेंड जिल्ह्यातील मुख्य भागाच्या रस्त्यावर गर्दी करू लागला.
हॉटेल व्यवसायिकांनाही एकदाच भाजी बनवण्याच्या पद्धतीने फायदेशीर ठरला शिवाय अगोदर पाच, दहा किलो मटण विकणारे हॉटेल आता दिवसासाठी २० ते ३० किलोच्या पुढे सरकले त्यामुळे या व्यवसायाला चालना मिळाली आहे. नॉनव्हेजचे जेवण एका व्यक्तीसाठी किमान तीनशे रुपया पर्यंत जायचे ढवारा, कंदुरी मटणचा ट्रेंडने ते २५० रुपयांना मिळू लागेल. शिवाय एकत्रित बनवले जात असल्याने ते चवीला उतरते हे सूप ग्राहकाना जास्त भावते त्यामुळे हा ट्रेड हॉटेल व्यवसायासाठी चालना देणारा ठरला आहे. हॉटेलपुढे बोकड कापून ते मोठ्या भांड्यात शिजवण्यासाठी चुली उभारल्या गेल्या असून बीड-केज रस्त्यावर हे चित्र मोठ्या प्रमाणात नजरेस पडते.
नफा घटला, मागणी वाढली!
ग्राहक थाळी विचारू लागल्याने व्यवसायात काहीसा बदल झाला अगोदर ग्राहक मटन बनवण्यासाठी आणायचे प्रत्येक व्यक्तीला नव्वद रुपये बनवण्याचे घेत होतो, भाकरी इतर वेगळे चार्जेस असायचे. त्यामुळे बिलाचा आकडा वाढायचा यामुळेच ग्राहक थाळीकडे वळले त्यांना हे फायदेशीर आहे. यामुळे नफा कमी मिळत असला तरी विक्री वाढल्याने ही पद्धत सगळ्यांनी अंमलात आणली असे हॉटेल व्यावसायिक बाबुराव शेळके यांनी सांगितले.