

गेवराई : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई नजीक गढीजवळ भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२६) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. माहिती मिळताच गेवराई पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या माहितीनुसार, क्रेनने टोचन करुन नेण्यासाठी चारचाकी वाहनाजवळ थांबलेल्या सहा जणांना भरधाव वेगात आलेल्या आयशर टॅम्पोने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर आयशर टेम्पो चालक फरार झाला आहे.
गेवराई येथील दिपक आतकरे यांचा मुलगा यश आतकरे आपल्या मित्रासह कारने येत असताना कार वाहनाला अपघात झाला होता. हे वाहन टोचन करुन आणण्यासाठी गेवराईतील बाळु आतकरे, भागवत परळकर, सचिन नन्नवरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव आणि दिपक सुरय्या हे वाहन टोचन करुन आणण्यासाठी गढी कारखान्यानजीक गेले होते. तिथे वाहन क्रेनने टोचन करण्यासाठी महामार्गावर ते उभे असताना बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्या भरधाव आयशर टेम्पोने चारचाकी वाहनाजवळ थांबलेल्या सहा जणांना जोराची धडक दिली. त्यामध्ये या सहा जणांचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला. आयशर टेम्पोने नंतर त्याच घटनास्थळापासून पुढे काही जणांना धडक दिली. यात अन्य दोघे जखमी झाले. अपघातानंतर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.
गेवराई येथील दाभाडे गल्लीतील रहिवासी असलेले भागवत परळकर हे आपल्या रिक्षात शालेय विद्यार्थ्यांना ने आण करण्याचे काम करत होते. दरम्यान, यावर ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. ते माजी नगरसेवक छगन हादगुले यांचे जावई असून मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी, भाऊ, आई असा परिवार आहे. मयतावर गेवराई येथील गवळी समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाळासाहेब आतकरे हे गेवराई येथील सावता नगर येथे गेल्या काही वर्षांपासून कापड दुकान व्यवसाय करत होते. मयताच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी आई, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेवराई तालुक्यातील रांजणी येथील रहिवासी असलेले मनोज करांडे यांचे गेवराई - शहागड रोडवर श्नी साई मोटर्स चारचाकी वाहनांचे गॅरेज आहे. ते सदरील चारचाकी गाडी दुरूस्त करण्यासाठी गेले होते. गाडी दुरूस्त करण्यासाठी क्रेन ने लगेच घेऊन येत असताना त्यांचाही अपघातात मृत्यू झाला आहे. मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी, आई वडील भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी गावातील स्मशानभूमीत पावसामुळे पत्रे टाकून अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिपक सुरय्या यांचा परिवार गेल्या ५० वर्षांपासून गढी येथे स्थित असून त्याचे वडील हे गेवराई नगर परिषद येथे कर्मचारी होते. तर ते भवानी बँकेत सेवक म्हणून काम करत होते. त्यांच्या वर गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
दिपक नन्नवरे हे गेवराई शहरातील संजय नगर भागातील रहिवासी असून मजुरी अमावास्या असल्याने कालच सोमवारी दोन दिवसांपूर्वी आपल्या बहिणीला घेऊन गेवराई येथे सकाळी आले होते. त्यांच्या वर गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कृष्णा जाधव हे गेवराई तालुक्यातील ब्रम्हपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे माऊली क्रेन असून क्रेनने ते चारचाकी गाडी आणण्यासाठी गेले होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला . त्यांच्या पश्चात दोन मुले, आई वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले.