

धारूरः अघाडी आणि महायुतीमुळे माजलगाव मतदारसंघात उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. मागच्या निवडणुकीला समोरासमोर लढलेली भाजपा व राष्ट्रवादी सध्या महायुतीत आहेत. यामुळे राजकारणात नवीन समीकरणे जुळत आहेत. सन २०१९ मध्ये निसटता पराभव झालेले रमेश आडसकर सध्या भाजपात असले तरी ते घड्याळ, तुतारी अथवा कमळाकडे आहेत? याचा काहीच ताळमेळ नाही. ते १३ ऑक्टोबरला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून तुतारी वाजववणार असल्याची प्रचंड चर्चा आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसे चित्र विचित्र होत आहे. येत्या काही दिवसांमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे. राज्यामध्ये महाआघाडी व महायुती हे नवीन समीकरण तयार झाल्याने इच्छुकांची पंचायत होऊन झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे भाग झाल्याने उमेदवारासह मतदार अडचणीमध्ये आला आहे. याच पार्श्वभूमीवर माजलगाव मतदारसंघांमध्ये मागील विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये चुरशीची निवडणूक झाली होती.
यात भाजपाचे रमेश आडसकर यांचा निसटता पराभव झाला. तेव्हापासून रमेश आडसकर मतदारसंघात आपला संपर्क वाढवत आहेत. गाठीभेटी घेत आहेत. पण मागील वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी है एकत्र आल्याने इच्छुक उमेदवारांची पंचायत झाली आहे. अजित पवार यांनी विद्यमान आमदारांना तिकीट मिळणार असल्याचे विधान करून माजलगाव मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला आहे. आ प्रकाश सोळंके यांनी आपली निवृत्ती जाहीर करून जयसिंग सोळंके यांना पुढे केले आहे.
विशेष बाब अशोक डक, माधव निर्मळ सोडले तर दुसरा उमेदवार पक्षामध्ये नाही. यामुळे जयसिंग सोळंके यांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे. या परिस्थितीत भाजपाचे नेते संदिग्ध अवस्थेत आहेत. उमेदवारीच मिळणार नसले तर इतर पक्ष का नको म्हणत काही नेते चाचपणी करत आहेत. बडे नेते सत्तेच्या मागे गेल्याने स्पेश निर्माण झाला आहे... यामुळे काही नेत्यांची अवस्था हाती सड्याळ बांधू की तुतारी वाजवू अशी झाली आहे.
दरम्यान, रमेश आडसकर यांचा १३ ऑक्टोचर रोजी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा मतदारसंघांमध्ये होत आहे. याला अधिकृत दुजोरा नसला तरी चर्चा मात्र जोरात सुरू आहे.
माजलगाव मतदार संघातील जनतेने कायम शरद पवार यांच्या नेतृत्वावर प्रेम केले आहे. सध्यातरी त्यांच्याकडे तगडा उमेदवार नाही. परंतु शरद पवार एक दिवस जिल्ह्यात येतील आणि सगळ्यात तगडा उमेदवार माजलगाव मतदारसंघात देतील, असे लोक बोलत आहेत.