

बीड, पुढारी वृत्तसेवा : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या मांजरसुंबा घाटात मळी घेऊन जाणारा टँकर पलटी झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मळी सांडली. या मळीवरून दुचाकी घसरल्याने दोन ते तीन दुचाकीस्वार जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती. ही घटना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.
सोलापूरहून धुळ्याच्या दिशेने जाणारा मळीचा टँकर कोळवाडी परिसरातील पुलाच्या कठड्यावर धडकून पलटी झाला. टँकरमधील मळी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडल्याने या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना त्याचा अंदाज आला नाही. मळीवरून दुचाकी घसरल्याने काही दुचाकीस्वार रस्त्यावर पडले. त्यात दोन ते तीन जणांना दुखापत झाली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही.अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल अर्धा तास ठप्प झाली होती. दरम्यान, मांजरसुंबा घाटात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच कोळवाडी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. त्यानंतर महामार्ग पोलिस आणि बीड ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. रस्त्यावर सांडलेली मळी हटविण्याचे कामही करण्यात आले.