वडीगोद्री : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तोफ आज (दि.८) मंत्री धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या परळीमध्ये धडाडणार आहे. घोंगडी बैठकीची परळीत जोरदार तयारी सुरू आहे. मात्र त्यापूर्वी घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे शनिवारी (दि.७) मध्यरात्री तीन वाजता भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मध्यरात्री तीन वाजता अंतरवाली सराटी येथे जाऊन धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. रविवारी (दि.८) मनोज जरांगे यांची परळी शहरामध्ये घोंगडी बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री झालेली ही बैठक महत्त्वाची असल्यास बोलले जात आहे. धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये अर्धा तास बैठक झाली. या बैठकीमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण या दोन्ही विषयावर प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती जरांगे यांनी दिली.
माझी भेट घेण्यासाठी कुणीही अंतरवालीत येऊ शकते; असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले होते. कृषिमंत्री चांगलं काम करत असतील तर त्यांचं कौतुक का करु नये, चुकल्यावर त्यांना सोडणार देखील नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी मराठ्यांशिवाय अन्य कुणाचाही होऊ शकत नाही. शरद पवार, एकनाथ शिंदे एकत्र येतील की नाही मला माहित नाही. आम्हाला निवडणुकीची तयारी करण्याची गरज नाही फक्त फॉर्म भरण्याची गरज आहे. मात्र निवडणूक लढवायची की नाही याबाबत अजून आमचा निर्णय झालेला नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज (दि.८) मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या परळीत घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीमध्ये जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लोकसभा निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपानंतर जरांगे पाटील हे प्रथमच परळीमध्ये येणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोंगडी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.