

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख यांनी राजकीय टीकांना उत्तर देताना स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. माझ्यासाठी सध्या राजकारण दुय्यम असून, माझ्या भावाला आणि गावाला न्याय मिळवून देणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मस्साजोग येथील सरपंचपदासाठी पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये स्वरूपानंद देशमुख विरुद्ध अश्विनी संतोष देशमुख अशी लढत होत आहे. यामध्ये अश्विनी देशमुख यांना निवडणूक लढवायची नव्हती, त्यांना ती लढवण्यासाठी दबाव आणण्यात आला असा आरोप स्वरूपानंद देशमुख यांनी केला होता.
राजकारण या ठिकाणी माझ्यासाठी दुय्यम आहे. सध्या केस हा महत्त्वाचा भाग असून त्यावरच माझा जास्त फोकस आहे. २१ तारखेला याबाबत सविस्तर उत्तर देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी इशारा दिला की, स्वरूपानंद देशमुख यांना जो कोणी पाठिंबा देईल, तो उघडपणे समोर येईल. गुप्त पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही. लोकशाही मूल्यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. मात्र, पीडित कुटुंबावर बोलताना संवेदनशीलता राखली पाहिजे. यावर आता स्व. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्वरूपानंद देशमुख यांच्याबाबत बोलताना त्यांनी, त्यांच्या बोलण्याकडे मी फारसे लक्ष देत नाही. त्यांना स्वाभिमानी मस्साजोगची जनता योग्य ते उत्तर देईल, असे म्हटले. ते पुढे म्हणाले, मला राजकारण करायचे असते तर मी स्वतःच उमेदवार झालो असतो. मात्र, सद्यपरिस्थितीत ते संयुक्तिक वाटले नाही. त्यामुळे मी या गोष्टीपासून दूर राहून केवळ न्यायाच्या लढाईवर लक्ष केंद्रित केले आहे.
कुटुंबावर होणाऱ्या टीकेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत, माझ्या कुटुंबावर कोणीही बोलण्याचा प्रयत्न करू नये. पीडित कुटुंबावर टीका करणे कितपत योग्य आहे, हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे, असा इशारा दिला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सांगितले की, २८ तारखेला मतदानातून सर्व काही स्पष्ट होईल. त्यानंतर निकाल लागल्यानंतर मी आणि वहिनी मिळून सविस्तर भूमिका मांडू. स्वरूपानंद देशमुख यांना कोणी उभे केले, हेही तेव्हा स्पष्ट करू. तसेच, माझ्या भावाने दलित बांधवांसाठी प्राणाची आहुती दिली आहे, असे भावनिक वक्तव्य करत त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केले.
बिनविरोध निवडणुकीच्या चर्चांबाबत त्यांनी सांगितले की, त्या बैठकीत मी कोणताही रस घेतला नाही. येत्या आठ-दहा दिवसांत सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, त्यामुळे सध्या त्यावर भाष्य करणे योग्य नाही. दरम्यान, येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.