

धारुर ः कांद्याच्या लागवडीपासून काढणीपर्यंत प्रचंड कष्ट केले. हातात पिक आल्यानंतर भाव मिळेल या आशेने थोडे-थोडे करून कांदे विकण्याचा निर्णय शेतकऱ्याने घेतला. धारूर तालुक्यातील अरणवाडी येथील शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच सोलापूरच्या कांदा मार्केटमध्ये 12 थैल्यांमध्ये 602 किलो कांदा पाठविला.
या कांद्याला 50 पैसे प्रतिकिलो भाव मिळाल्यामुळे 301 रुपये आले. हा कांदा मार्केटमध्ये पोहचविण्यापासून विक्री होईपर्यत शेतकऱ्यास 1 हजार 939 रुपये खर्च आला. त्यामुळे शेतकऱ्यास खिशातुनच 1 हजार 538 रुपये दंड भारावा लागल्याची घटना सोलापूरच्या कांदा मार्केटमध्ये शुक्रवारी (दि.22) घडली.
धारूर तालुक्यातील आरणवाडी गावातील शेतकरी संतोष भास्कर शिनगारे यांनी 1 एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. काही दिवसांपूर्वी हा कांदा शेतातुन काढून ढिगारा लावला आहे. पावसाचे दिवस सुरू होण्यापूर्वी थोडा-थोडा करून कांदा विकण्याचा निर्णय शेतकऱ्याने घेतला.
त्यानुसार 38 रुपये प्रति थैली विकत घेऊन 12 थैलींमध्ये कांदा भरून सोलापूराच्या मार्केटमध्ये पाठवला. या कांद्याचे वजन 602 किलो भरले. कांद्याला 50 पैसे प्रतिकिलो भाव मिळाल्यामुळे 301 रुपये झाले.
मात्र, हा कांदा सोलापूर मार्केटपर्यंत पोहचविण्यापासून विक्री होईपर्यंत 1839 रुपये खर्च आला होता. शेतकऱ्याची मेहनत तर वाया गेलीच पण कांदा विक्री केल्यामुळे शेतकऱ्यास 1 हजार 538 रुपये दंड सहन करावा लागल्याचे शेतकरी संतोष शिनगारे यांनी सांगितले.
कधी ना पिकी, तर कधी दर कमी
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टीचा सामना करावा लागतो. निसर्गाच्या या लहरीपणामुळे बऱ्याचदा पिक येत नाही. जर पिक चांगले आले तर त्याला पिकाला चांगला बाजारभाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. सरकारने आता कर्जमाफी जाहीर केली असली तरी त्यातही वेगवेगळ निकष लावले जातील. त्यामुळे या कर्ज माफीच्या लाभाबद्दल देखील शेतकरी साशंक आहेत.
विक्रीसाठी लागलेला खर्च
12 थैलीची किंमत : 456 रुपये, वाहतूक भाडे : 1200 रुपये, हमाली : 62 रुपये, तोलाई : 37 रुपये, स्त्री ह. : 24 रुपये, वारणी : 60 रुपये ः एकूण खर्च : 1839
शेतातील कांद्याचे करावे काय ?
सोलापूरच्या मार्केटमध्ये 12 कट्टे (थैली) कांदा पाठविला होता. त्यात 1538 रुपये दंड झाला. त्यामुळे आता शेतात असलेल्या 10 टनांपेक्षा अधिक वजनाच्या कांद्याचे काय करावे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच कर्जबाजारी त्यात विक्रीतच दंड झाला. अशीच परिस्थिती इतर पिकांची देखील आहे. असा तोटा जर प्रत्येक पिकात होणार असेल तर शेतीच कशाला करावी असा सतत मनात विचार येत असल्याचे शेतकरी संतोष शिनगारे यांनी सांगितले.