

Electricity outage in Gevrai city
गेवराई, पुढारी वृत्तसेवा : शहरातील ताकडगाव रोड परिसरातील श्रीसमर्थ मातोश्री पार्क, तथास्तु मंगल कार्यालय परिसर व माधव नगर भागात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाच-दहा मिनिटांच्या अंतराने वीज ये-जा करत असून, वीजपुरवठा सुरू असतानाही कमी दाबाचा सामना करावा लागत आहे. - त्यामुळे विद्युत उपकरणे चालविण्यात अडचणी येत असून, उपकरणांचे नुकसान होण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ताकडगाव रोड परिसरात गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर नवीन घरे व वसाहती उभ्या राहिल्या आहेत. मात्र वाढत्या लोकवस्तीच्या तुलनेत विद्युत वितरण यंत्रणेत वाढ झालेली नाही. तथास्तु मंगल कार्यालयासमोरील एकाच रोहित्रावर मोठा भार असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या भागातील वाढती वीज मागणी लक्षात घेऊन महावितरणने तातडीने नवीन रोहित्र बसवावे, कमी दाबाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा आणि वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान वारंवार तक्रारी करून देखील महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे वीज बिल वसूलीची सक्ती करणारे महावितरण सेवा पुरवण्याबाबत मात्र अशा पध्दतीने चाल ढकल करत असल्याचा हा प्रकार समोर आला आहे.
नवीन रोहित्रासाठी सर्व्हे झाला; तरी विलंब
श्रीसमर्थ पार्क, मातोश्री पार्क, माधव नगर व तथास्तु मंगल कार्यालय परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी रहिवासी तथा पत्रकार विनोद नरसाळे यांनी नवीन रोहित्राची मागणी केली होती. त्यानंतर महावितरणने सर्व्हे करून रोहित्रासाठी जागाही निश्चित केली. मात्र सव्र्व्हेला महिना उलटूनही रोहित्र बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे नवीन रोहित्र तातडीने बसवून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी विनोद नरसाळे यांनी केली आहे.