

Purshottam Puri Woman Dies In Boat Capsize
टाकरवन : बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अन्य भविक जखमी झाले असून एक महिला गंभीर आहे. रुग्णांवर माजलगावच्या सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेमुळे यात्रास्थळी एकच खळबळ उडाली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तम मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे अधिकमास यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. बुधवारी नदी पार करण्यासाठी भाविकांनी भरलेली बोट गोदावरी नदीच्या मध्यभागी पोहोचताच अचानक तोल जाऊन उलटली. बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप भाविकांनी केला आहे.
माहितीनुसार, बोटीत सुमारे 40 ते 50 प्रवासी होते. बोट उलटल्यानंतर सर्व प्रवासी नदीत पडले. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाच्या मदतीने अनेक भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र एक अल्पवयीन मुलगा अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
या दुर्घटनेत प्रणिला शेषेराव राठोड (वय 55, रा. लोणार) यांचा मृत्यू झाला. तर सिंधूबाई अर्जुन मवाळ (वय 75, रा. महागाव, जि. वाशिम) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, यात्रास्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. बोटीतून प्रवास करणार्या भाविकांना लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात येत नसल्याची तसेच गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याशिवाय जिल्ह्याच्या पालकमंत्री, खासदार, स्थानिक आमदार यांच्यावर भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे.