

केज : तालुक्यातील चिंचोली माळी येथे विजेच्या शॉटसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका शेतकऱ्याचे घर व गोठा जळून खाक झाला. या आगीत गोठ्यातील एक निष्पाप कुत्रा आणि म्हशीचे लहान वासरू होरपळून जागीच ठार झाले, तर दोन म्हशी आणि वगार गंभीर भाजल्या आहेत. ही घटना सोमवारी (दि.१३) दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, चिंचोली माळी येथील शेतकरी महेंद्र अविनाश घोडके हे गावाजवळच आपल्या शेतात वास्तव्यास आहेत. घरावरून गेलेल्या विद्युत तारांमध्ये दुपारी तीनच्या सुमारास शॉटसर्किट झाले आणि ठिणग्या गोठ्यावर पडल्या. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यावेळी महेंद्र घोडके घरी नव्हते. घरातील महिलांनी आग पाहताच आरडाओरडा केला, मात्र आग इतकी भीषण होती की, ती गोठ्यातून घरापर्यंत पसरली.
या आगीत गोठ्यात बांधलेला कुत्रा आणि लहान वासरू यांचा होरपळून मृत्यू झाला. सुदैवाने, दोन म्हशी आणि वगार यांनी दावे तोडल्यामुळे त्या बाहेर पडल्या, मात्र त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ग्रामस्थांनी आणि अग्निशमन दलाने तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. तोपर्यंत घरातील अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य आणि शेती अवजारे जळून खाक झाली होती. महसूल अधिकारी शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमी जनावरांवर उपचार सुरू आहेत. शासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने मदत द्यावी, अशी नागरिकांतून मागणी केली जात आहे.