

गेवराई : शहरात वीजपुरवठ्याचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून, लाईट कार्यालयाच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. छोट्या-छोट्या बिघाडांसाठीही तासन्तास वीज बंद ठेवली जात असून, दोन-दोन तास विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
सबस्टेशनला वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार सर्वत्र ऐकू येत आहे. फोन लावला तर लागत नाही, आणि उचलला तरी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शहरात वीज समस्यांबाबत तक्रारींचा ढिग साचला असताना, त्यावर कार्यवाही मात्र शून्य असल्याचे चित्र आहे. “आकडे वाढत आहेत, पण त्यावर प्रत्यक्ष काम कधी होणार?” असा थेट सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
नवीन गेवराई भागात तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता दररोज पहाटे तसेच सायंकाळी ७ ते ९ या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ऐन उन्हाळ्यात अशा अघोषित वीज कपातीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
विद्यार्थ्यांचा अभ्यास कोलमडला आहे, लघुउद्योगांना फटका बसत आहे आणि घरगुती कामांवरही मोठा परिणाम होत आहे. नागरिकांचा संयम आता सुटत चालला असून, प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला असून रात्री 9वाजल्यापासून लाईट चा लपंडाव चालू असून आद्यापर्यत लाईट आली नव्हती.