

धारूर : धारूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 198/2026 मधील फरार आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून महिलांची फसवणूक करणाऱ्या गंभीर प्रकाराचा उलगडा झाला आहे. यामध्ये जवळपास 150 महिलांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. की पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील गिताजी गिरी (रा. जमालपूर, ता. औसा, जि. लातूर) याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तपासादरम्यान त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्यातील माहितीची छाननी केल्यानंतर धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
आरोपी सोशल मीडियावरील फेसबुक, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटसारख्या माध्यमांचा वापर करून महिलांशी संपर्क साधत होता. प्रेमसंबंधाचे आमिष दाखवून त्याने 150 पेक्षा अधिक महिलांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित तक्रारदार महिलेला लातूर व पुणे येथे नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा तसेच तिच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने खर्च केल्याचा आरोपही तपासात समोर आला आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकट राम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी संबंध ठेवताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.या कारवाईत सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम, पोह बाळासाहेब डापकर, पोह विकास चोपणे, पोह मिसाबदीन इनामदार, पोह मल्लिकार्जुन माने, पोशी अशपाक इनामदार, पोशी करांडे सह धारूर पोलीस शेप सह पोलीस अधिकारी कर्मचारी या पथकाने सहभाग घेतला