

केज : पीडित कुटुंबाने मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले आहे, मग मी कसा काय भेटायला जाणार? नसता मी भेटायला गेलो असतो. तो रमेश घुले फिर्यादी आहे, त्याची आणि माझी ओळख आहे, तो मला यापूर्वी भेटलेला आहे. या प्रकरणात पोलिस तपासात आम्ही पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे खा.बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी आ.धनंजय मुंडे यांनी स्व.विलास घुले यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नाव न घेता खा.सोनवणे यांच्यावर टीका केली होती. तसेच शुक्रवारी सायंकाळी एसआयटीने देखील खा.सोनवणे यांच्या घरी भेट देत चौकशी केली. यानंतर खा.सोनवणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. खा.सोनवणे म्हणाले की, दहावा आरोपी अद्यापही या प्रकरणात कोणीही नाही, तो आरोप करणाऱ्यांनी जाहीर करावा.
माझ्या मुलाचे नाव या प्रकरणात आहे, परंतु ते पुरवणी जबाबात आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. आता पोलिस तपास करत आहेत, त्या तपासात सर्व काही समोर येईल. मी या प्रकरणात कुठेही सहभागी असल्याचे सिद्ध झाले, तर माझ्यावरही कायदेशीर कारवाई करावी, असे आव्हान त्यांनी दिले.
उमेश माने प्रकरणाचा संदर्भ देताना त्यांनी, माझा मूळ प्रश्न एकच आहे. उमेश माने यांना मारण्यासाठी आरोपी का आले होते? त्यामागचे कारण काय होते? माने यांनी कोणता गुन्हा केला होता का, याचाही खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी केली.
पोलिस तपासावर थेट भाष्य करण्यास त्यांनी नकार देत, तपास सुरू आहे. तपासानंतर पोलिस ज्याला आरोपी करतील त्याच्यावर कारवाई होईल. माझ्याकडे आणखी काही पुरावे येणार आहेत, मात्र तपासावर मी भाष्य करणार नाही, असे सांगितले. आपल्या मुलाच्या नावाचा उल्लेख होत असल्याबाबत त्यांनी, माझ्या मुलाचा फोन जप्त करायचा असेल तर जरूर करा. माझा फोन जप्त करण्यासाठी मात्र कायदेशीर परवानगी घ्यावी लागेल, असे म्हटले. या प्रकरणात माझा एक जरी कॉल असेल तर दाखवावा. लोकप्रतिनिधी म्हणून पोलिस अधीक्षकांशी बोलणे हा माझा अधिकार आहे, असे स्पष्ट केले.
पीडित कुटुंबाला भेट न दिल्याच्या प्रश्नावर त्यांनी, पीडित कुटुंबानेच मला आरोपीच्या पिंजऱ्यात बसवले आहे. अशा परिस्थितीत मी त्यांच्या घरी कसा जाऊ? मला आरोपी ठरवले नसते तर मी त्यांची भेट घेतली असती, असे उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीबाबत त्यांनी, सोमवारी आणि बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट झाली; मात्र या प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही. पोलीस अधीक्षकांना मुख्यमंत्र्यांचा फोन आला का, हे त्यांनाच विचारावे, असे म्हणत या प्रकरणात आम्ही पोलिस प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे देखील खा.सोनवणे यांनी म्हटले.
राजकीय आरोपांवर उत्तर देताना त्यांनी, मुख्यमंत्र्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. ते चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होऊ देणार नाहीत. आम्ही विरोधात असल्याने सरकारवर टीका करणे हे आमचे काम आहे. मात्र सरकारमध्ये असलेल्यांनीच आंदोलन करणे योग्य आहे का, हा प्रश्न आहे, असे मत व्यक्त केले.स्वतःच्या हालचालींबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी, मी बीड जिल्ह्यातच होतो. मुंबईत सुप्रिया ताईंच्या मुलीच्या लग्नासाठी गेलो होतो आणि त्यानंतर रात्री बीडला आलो. माझ्या घरात व कार्यालयात सीसीटीव्ही आहेत. माझी हालचाल, लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासता येतील, असे सांगितले.