

धारूर: वाण नदीवर आवरगाव येथे ऑटोसह वाहून गेलेला धारूर येथील अनिल बाबुराव लोखंडे याचा मृतदेह अखेर तीन दिवसानंतर सापडला. मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील विशेष बचाव व सुरक्षा पथक व धारूर अग्निशामकदल यांच्या पथकाने अखेर शोधून काढला. घटनास्थळापासून साधारणता अर्धा किलोमीटर अंतरावर पात्राच्या बाजूस झाडीमध्ये अडकलेल्या अवस्थेत हा मृतदेह आज (दि.३०) आढळून आला.
धारूर तालुक्यात २७ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे अंजनडोह व आवरगाव येथून नदीपात्रातून दोन जण वाहनासह वाहून गेल्याची घटना घडली होती. पहिला मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळीच सापडून आला, मात्र आवरगाव येथील वाण नदीवरून वाहून गेलेला अनिल बाबुराव लोखंडे याचा मृतदेह दोन दिवस शोधकार्य करून ही महसूल व पोलीस पथकास सापडत नव्हता. छत्रपती संभाजीनगर येथील बचाव व सुरक्षा पथक व धारूर येथील नगरपरिषदचे अग्निशामक दलाच्या पथकाने शोधमोहीम केली. दरम्यान शनिवारी (दि.३०) सकाळी नदीपात्राच्या दुसऱ्या बंधाऱ्याच्यामध्ये बाजूला झाडीमध्ये अडकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.
पाण्यातून वाहून गेलेल्या इसमाचा पूर्ण चेहरा हा विद्रूप अवस्थेमध्ये आढळून आला आहे. पाण्यातील माशांनी मृतदेह खाल्यामुळे अशा अवस्थेत तो सापडला आहे. बचाव व सुरक्षा पथक आणि पोलीस प्रशासनाने हा मृतदेह सापडण्यासाठी दोन दिवस अथक परिश्रम घेतले हा मतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो त्यांच्या नातेवाईकांना रीतसरपणे सर्व प्रशासकीय कारवाई करून ताब्यात देण्यात आला आहे.