

माजलगाव ः माजलगाव शहरालगत असलेल्या मनुर शिवार परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशांचे अवशेष पोत्यांमध्ये भरून टाकल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
स्थानिक हिंदू तरुणांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर माजलगावमध्ये तब्बल दोनशे गोवंशांची कत्तल करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यानंतर हे अवशेष पोत्यांमध्ये भरून मनुर शिवार परिसरात टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी संबंधित प्रशासन आणि पोलीस विभागाने तातडीने दखल घेऊन अवशेषांची तपासणी करावी, दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत गोवंशाची कत्तल झाल्याच्या दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नसून, पोलिस व संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
दोषींवर कारवाई करा!
माजलगावमध्ये बकरी ईदच्या दिवशी तब्बल दोनशे गोवंशांची कत्तल झाल्याची माहिती समोर आल्याने हिंदू संघटना संतप्त झाल्या आहेत. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे. यामुळे पोलिस देखील अलर्ट झाले असून बंदी असताना गोवंशांची कत्तल करणाऱ्यांचा शोध आता घेतला जात आहे.
शिरूर तालुक्यात दाखल झाला गुन्हा
बकरी ईदच्या दरम्यान गोवंशाची कत्तल होऊ नये याकरिता सतर्कता बाळगली जात होती. तरीही शिरूर तालुक्यातील मानुर येथे दोघा बापलेकांनी गोवंशाची कत्तल केली. याचे अवशेष त्याच्या घरासमोर आढळून आल्यानंतर तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी हे गोवंशाचे अवशेष जप्त करत मानुर येथील दोघा बापलेकांवर गुन्हा दाखल केला आहे.