औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ११ फुट उंचीचा पुतळा अखेर बुधवारी (दि.८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आणण्यात आला. संध्याकाळी पुतळा विद्यापीठ गेटवर येताच फुलांचा वर्षाव करुन जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रशासकीय इमारती समोरील नियोजित जागेवर हा पुतळा चौथऱ्यावर ठेवण्याचे काम रात्री उशीरापर्यंत करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सिव्हील वर्कचे काम पूर्ण झाले होते, प्रतिक्षा केवळ पुतळा विद्यापीठात दाखल होण्याची होती. बुधवारी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी खुलताबाद येथे जाऊन पुतळ्याचे पुजन केले आणि त्यानंतर पुतळा औरंगाबादकडे रवाना करण्यात आला. संध्याकाळी पुतळा विद्यापीठाच्या मुख्य गेटवर येताच विद्यार्थी, विद्यार्थी संघटना संघटनांकडून मोठा जल्लोष करत पुतळ्याचे स्वागत केले. विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा प्रस्ताव माजी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या काळात मंजूर करण्यात आला होता. मात्र, अंतर्गत विरोध, पुतळ्याची जागा आणि प्रशासकीय दिरंगाईत या पूर्वनियोजित प्रकल्पाचे काम मागे पडले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा ११ फुट उंच असून, नियोजित जागेवरील ११ फुट उंच चबुतऱ्यावर पुतळा बसवण्यात येणार आहे. ब्रॉन्झ, पंचधातुमध्ये तयार करण्यात आलेला पुतळा हा सव्वा दोन टन वजनाचा आहे. संपुर्ण पुतळा तयार करण्यासाठी ३५ लाख रुपये आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणासंबंधी मुख्यमंत्री कार्यालयासोबत बोलणे झाले असून येत्या १६ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुतळा अनावरण होण्याची शक्यता आहे. अद्याप संबंधित कार्यालयाकडून कार्यक्रमाची तारीख निश्चित कळवण्यात आलेली नाही. छत्रपती शिवरायांचा पुतळा विद्यापीठात बसवणे ही एक ऐतिहासिक घटना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे दोन्ही पुतळे प्रेरणादाई ठरतील. विद्यापीठात छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यात यावा, अशी बऱ्याच वर्षांची मागणी होती, ही मागणी माझ्या कार्यकाळात पुर्ण झाली हे मी माझे भाग्य समजतो असेही कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.