छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. त्यांनी एसआयटी चौकशी रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, खरंच तसे होईल का? की त्यांनी केवळ शेंगा हाणल्या, हे लवकरच कळेल, अशा शब्दांत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी फडणवीसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला. गुरुवारी उपोषण मागे घेतल्यानंतर शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी (दि.१४) ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
सभागृहात मराठा आंदोलनावर एसआयटी चौकशी स्थापन झाली. त्यावेळी आनंदाने बाके वाजवणारेच आता मला भेटायला येत आहेत. हे मराठा समाजाच्या एकजुटीचे यश असल्याचे म्हणत त्यांनी सत्ताधारी आमदारांना टोला लगावला. तसेच आता पुढील एक महिन्याच्या आत आरक्षण मिळाले नाही. तर संपूर्ण समाज रस्त्यावर उतरेल व विधानसभा निवडणूक देखील लढवणार, असेही ते म्हणाले.
मी समाजासाठी लढत आहे, कुठेही असलो तरी माझे आंदोलन सुरूच आहे. मंत्री देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच सर्व समाजाची बैठक पार पडणार आहे. आपल्या हक्काचे एक कार्यालय शहागड येथे स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अंतरवाली सराटी येथील नागरिकांचे व गावाचे उपकार मी कधीही विसरणार नाही. आता सर्व घडामोडी मुंबईतून घडणार आहे. त्यामुळे सतत गावात गर्दी होऊ नये, यासाठी शहागड येथे कार्यालय सुरु करून तिथून काम पाहणार असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा