पिंपळनेर: बीड जिल्ह्यात मागील वर्षभरात अल्पशा प्रमाणात पाऊस पडल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तर काही ठिकाणी तलावाने तळ गाठला आहे. काही दुष्काळी भागात तलाव, विहिरी, बोअरवेल, हातपंप कोरडे पडले आहेत. यामुळे शेतकरी, नागरिक संकटात सापडला आहे.
बीड तालुक्यात पिंपळनेर नजीक आसणाऱ्या ताडसौन्ना गावात विठ्ठल माने या शेतकऱ्याने दिवस रात्र काबाड कष्ट करून २ एकरवर मोसंबीची लागवड केली होती. मागील पाच वर्षांपासून जवळपास ३५० मोसंबीची झाडे लावली होती. बाग जगविण्यासाठी टँकरने पाणी घातले. लाखो रूपये खर्च करूनही दोन बोअर घेतल्या. परंतु, पाणी लागले नाही.
यावर्षी मोसंबीचे फळ पदरात पडेल, अशी आशा होती. परंतु, सध्या विहीर, बोअरवेल कोरडे पडले असून उष्णतेची भयंकर लाट आली आहे. त्यामुळे बाग करपू लागली. परिणामी संपूर्ण झाडे उपटून टाकण्याची वेळ माने यांच्यावर आली आहे.
पाच वर्ष दिवस रात्र कष्ट करून दोन एकरात मोसंबीची बाग वाढविली. जिवापाड संगोपन केले. परंतु, पाण्याअभावी झाडे वाळू लागली आहेत. त्यामुळे बाग उपटून टाकण्याशिवाय पर्याय नाही.
– विठ्ठल माने
हेही वाचा