मानवत : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी ही जुनीच आहे. राज्य सरकारने दिलेले १० टक्के आरक्षण समाजाला मान्य नाही. मराठा समाजाला फक्त ओबीसीमधूनच आरक्षण द्या, अन्यथा येत्या लोकसभा निवडणुकीत तुमचा सुपडा साफ होईल, असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला. मानवत येथे आयोजित संवाद बैठकीत ते बोलत होते. Manoj Jarange patil
मानवत- पाथरी राष्ट्रीय महामार्गावर तहसील कार्यालयाजवळ रविवारी (दि.१०) रात्री संवाद बैठकीचे आयोजन केले होते. Manoj Jarange patil
यावेळी ते म्हणाले की, गेल्या ७५ वर्षात राजकीय नेत्यांनी मराठा समाजाचा फक्त वापर केला आहे. समाजाने कोणत्याही नेत्यापुढे हात पसरवू नये, असे सांगत राज्य सरकारने दिलेले १० टक्के आरक्षण आम्हाला मान्य नाही.
मराठ्यांना फक्त ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे असून सगेसोयरे बाबत सरकारने २०१२ च्या कायद्यात सुधारणा करावी, असे सांगितले. सरकार एसआयटी चौकशी करून माझा गेम करू पाहत आहे. मला अटक करून जेलमध्ये टाकू शकतात. परंतु माझी मान कापून जरी नेली, तरी मी मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठ्यांविषयी एवढा द्वेष कसा काय आहे ? फडणवीस माझ्यावर व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे नोंद करत आहेत. परंतु, आता आम्ही माघार घेणार नाही, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळवून देणार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी यावेळी केला.
उपोषणादरम्यान चिडचिड होते, तेव्हा काही बोललो असेल. परंतु, सरकारने आंतरवली सराटीमध्ये आंदोलनादरम्यान लाठीमार करून महिला, मुलींचे डोके फोडले, गोळ्या घातल्या, तेव्हा आई, बहिणी दिसल्या नाही का ?, असा सवाल उपस्थित केला.
हेही वाचा