Parbhani News : स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतर मिळणार तीन गावांना पक्का रस्ता; २३ गावांच्या ‘उलगुलान’ आंदोलनाला यश | पुढारी

Parbhani News : स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतर मिळणार तीन गावांना पक्का रस्ता; २३ गावांच्या 'उलगुलान' आंदोलनाला यश

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा भुसकवडी चितनरवाडी गावांना पक्का डांबर रस्ता मिळावा, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून “उलगुलान आंदोलन” करून अविरत प्रयत्न करणाऱ्या गावकऱ्यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. राज्यात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात बेलखेडा ते पिंप्राळा 1.40 लक्ष भुसकवडी ते गडदगव्हाण जोडरस्ता 3.50 लक्ष चितनरवाडी पुल 1.40 लक्ष गावांना पक्का डांबर रस्ता निर्मितीसाठी 6.30 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. शिवाय जिल्हा नियोजन समितीच्या वतीने रस्ता सुधारणा कामी पिंप्राळा 60 लक्ष आणि चितनरवाडी 50 लक्ष रुपयांचा निधी देखील प्राप्त झाला आहे. Parbhani News

जिंतूर तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जवळपास तेवीस गावांना पक्का डांबर रस्ता आणि पुल उपलब्ध नसल्याने गावांतील शिक्षण, आरोग्य आणि शेती व्यवसायावर परिणाम झाला होता. तेवीस गावांपैकी पिंप्राळा आणि चितनरवाडी या गावांना स्वातंत्र्यापासून पक्का डांबरी रस्ता मिळाला नाही. भुसकवडी या गावाची अक्षरशः ससेहोलपट सुरू होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रस्ता आणि पुलांसाठी ग्राम विकास मंत्रालयाकडे कोट्यवधीचा निधी अडकून पडला होता. दोन वर्षांपूर्वी तेवीस गावांतील नागरिकांनी उलगुलान आंदोलन करून लालफितीचा मार्ग मोकळा केला होता. Parbhani News

उर्वरीत पिंप्राळा भुसकवडी आणि चितनरवाडी या गावांना न्याय मिळावा, म्हणून सातत्याने प्रयत्न सुरू होते. रस्त्याअभावी आजारी रुग्णांना उपचारासाठी वेळेवर पोहचता न आल्याने प्राण गमवावे लागले होते. अखेर नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार मेघना बोर्डीकर यांनी मतदारसंघातील इतर रस्ता आणि पुलाच्या यादीत या तीनही गावांचा रस्ता प्रश्न मार्गी लावला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला निधी प्राप्त झालेल्या रस्त्यांचे भूमिपूजन करून आगामी पावसाळ्यापूर्वी रस्ता निर्माण करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

जिंतूर सेलू मतदार संघासाठी आशियाई विकास बँकेकडून तब्बल 355 कोटी रुपयांसह मतदारसंघांमध्ये 445 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. मंजूर विकास कामांमध्ये डांबर आणि सिमेंट रस्ते, पुल, उडाणपूल, पथदिवे, ड्रेनेज, रस्ता चौपदरीकरण, रस्ता सुधारणा आणि रुंदीकरण, मंडळ आणि तलाठी कार्यालय बांधकाम यांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

पक्का डांबर रस्ता आणि पुलाच्या निर्मितीसाठी गावकऱ्यांनी उभारलेल्या उलगुलान लढ्याला आज निम्मे यश मिळाले आहे, रस्ता निर्मितीनंतरच खरे यश मिळालेले असेल. आणि तेंव्हाच खऱ्या अर्थाने गावांत स्वातंत्र्याची पहाट उगवेल. हे सर्व यश गावकऱ्यांच्या एकदिलाने लढलेल्या लढ्याचे आहे.

पत्रकार रत्नदीप शेजावळे (उलगुलान आंदोलन समन्वयक)

जिंतूर सेलू मतदार संघासाठी 445 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून नागपूर हिवाळी अधिवेशनात दुर्गम भागातील गावांसाठी भरघोस निधी प्राप्त झाला आहे. भुसकवडी पिंप्राळा आणि चितनरवाडी गावकऱ्यांना दिलेला शब्द पाळला असून, रस्ता निर्मितीचे काम लवकरच सुरू होईल.

आ. मेघना बोर्डीकर (जिंतूर- सेलू)

हेही वाचा 

परभणी ; आयशर ट्रकला धडक देत ट्रक पुलावरून कोसळला; दोनजण जखमी

 

Back to top button