बीड : कर्जाच्या चिंतेतून शेतकऱ्याने जीवन संपवले | पुढारी

बीड : कर्जाच्या चिंतेतून शेतकऱ्याने जीवन संपवले

परळी वैजनाथ : पुढारी वृत्तसेवा पाऊस पडत नसल्याने पिके वाळून चालली आहेत. दुष्काळाने चिंता वाढवली आहे. आपल्यावरील कर्ज कसे फेडावे याच्या भ्रांतीत असलेल्या वैजवाडी ता.परळी वैजनाथ येथील एका शेतकऱ्याने या चिंतेतून आपले जीवन संपवल्‍याची घटना घडली आहे.

परळी तालुक्यातील वैजवाडी या गावचे रहिवासी असलेले बालाजी ज्ञानोबा ढाकणे (वय 45 वर्षे) या शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवल्‍याची घटना आज बुधवार (दि.30) सकाळी उघडकीस आली. शेतीवरचे कर्ज व अन्य कर्जाची त्यांना चिंता लागलेली होती. यातच सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती, पावसाअभावी शेतातील उभे सोयाबीन पीक जळत असल्याचे पाहून या चिंतेत आणखीनच वाढ झाली. सुगी तर हातची जाणार, आता आपण कर्ज कसे फेडावे या चिंतेने ग्रस्त होत या शेतकऱ्याने आपले जीवन संपवले आहे. घटनास्थळी तलाठी विष्णू गीते यांनी स्थळ पाहणी करून पंचनामा केला.

दरम्यान, मृत शेतकरी बालाजी ढाकणे यांची दोन एकर शेती आहे. यात त्यांनी सोयाबीन पीक घेतले होते. पावसाअभावी हे पीक वाळून जात असल्‍याचे पाहून ते निराश झाले होते. त्‍यातच कर्ज कसे फेडणार या विवंचनेत ते होते. त्‍यातूनच त्‍यांनी आपले जीवन संपवले. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी, दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.

Back to top button