

नेकनूर; पुढारी वृत्तसेवा बीड तालुक्यातून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ धुळे ते सोलापूर या महामार्गावर मांजरसुंभा येथील बीडकडे जाणा-या उड्डाणपूल संपतो त्या ठिकाणी रस्त्यावर खड्डा पडला आहे. हा खड्डा नव्हे तर रस्त्यावर भलमोठ भगदाडच पडल्याच दिसून येत आहे. रात्री अपरात्री वाहनधारकाच्या लक्षात न आल्यास मोठ्या अपघाताची शक्यता आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी तातडीने दुरुस्ती करून खड्डा बुजविण्यात यावा अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड, यांच्या मार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी, महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद अरविंद काळे यांना केली आहे.
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. शासकीय नोंदीनुसार जानेवारी ते एप्रिल २०२३ दरम्यान १२० दिवसात १२९ अपघात आणि १३९ जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय ९८ अपघातात १३० जण गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे. या अपघातास अतिवेगाबरोबरच रस्त्याची दुरवस्था कारणीभूत ठरत आहे.
अपघात होण्यास अतिवेग हे जरी मोठ्या प्रमाणात कारण असले तरी वाहनधारकांचा निष्काळजीपणा, ओव्हरटेक करणे, चुकीच्या दिशेने प्रवेश अथवा वाहन चालवणे दिशादर्शक फलक नसणे त्याच बरोबर निकृष्ट दर्जाचे रस्ते जागोजागी रखडलेले अपुर्ण रस्ते व खड्डे पडणे हे सुद्धा अपघाताचे प्रमुख बनले आहे. रविवार रात्री भाविकांच्या पिकअपला दिशादर्शक फलक नसल्याने अचानक वळण्याने अपघात घडला. या ठिकाणी वारंवार अपघात घडले असले तरी रस्ता कंपनीकडून सुधारणा केली जात नसल्याने वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे.
रस्ता सुरक्षा अभियान कागदावरच केवळ फोटोसेशन
प्रशासनाकडून राबविण्यात येणारे "रस्ता सुरक्षा अभियान"कागदावरच असुन, रापम, पोलिस प्रशासन आणि आरटीओ विभाग लाखों रुपये खर्च करून जनजागृतीच्या नावाखाली केवळ फोटोसेशन करताना दिसुन येते. याचा फारसा फायदा दिसून येत नसल्याने अपघात रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविणे गरजेचे आहे. रस्त्यावरील या खड्ड्यामुळे अनेकांच्या जीवितास धोका असल्याने याची तक्रार संबंधिताकडे केली आहे.
डॉ.गणेश ढवळे, लिंबागणेशकर