सेनगाव तालुका तेलंगणा राज्यात समाविष्ट करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
गोरेगाव, पुढारी वृत्तसेवा : सततची नापिकी, शेतमालाला अल्प प्रमाणात मिळणारा भाव यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तरी सेनगाव तालुका तेलंगणा राज्यात समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबत तहसीलदार जिवककुमार कांबळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
गेल्या तीन चार वर्षापासून नैसर्गिक आपत्तीत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि पीकविम्याची रक्कम अल्प प्रमाणात मिळत आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. अतिवृष्टीच्या अनुदानात सरकार हात आखडता घेत आहे. वीजबील वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांची कृषी पंपाचे कनेक्शन बंद केले जात आहे. या समस्येमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. तरी, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, कापूस, सोयाबीनला योग्य भाव द्यावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, वीजबील माफ करावे, अन्यथा तेलंगणा राज्यात सेनगाव तालुका समाविष्ट करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते गजानन कावरखे नामदेव पतंगे यांनी सेनगाव तहसीलदार जिवककुमार कांबळे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
हेही वाचा