हिंगोली : वीज पुरवठा विस्कळीत; अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना चार तास कोंडले | पुढारी

हिंगोली : वीज पुरवठा विस्कळीत; अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना चार तास कोंडले

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालु्क्यातील डोंगरकडा येथे वीज पुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्यादरम्यान, वीज कंपनीच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडून ठेवले. त्यानंतर पोलीस आल्याने खिडकीतूनच गावकरी व अभियंत्यांमधे चर्चा सुरु होती. दुपारी साडेतीन वाजता लेखी आश्वासनानंतर चार तासाने कुलुप उघडण्यात आले.

कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील गावकऱ्यांनी चार महिन्यापूर्वी वीज कंपनीच्या अभियंत्यांकडे खांब बदलून देणे, वीज वाहिन्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.

मात्र या मागणीकडे अभियंताने दुर्लक्ष केले. डोंगरकडा गावात मागील काही दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. सकाळ पासून रात्री आकरा वाजेपर्यंत वीज पुरवठा चालु – बंद होत होता.

तर रात्री अकरा वाजता वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर पहाटे पाच वाजता तो सुरळीत होत होता.

वीज पुरवठा
संतप्त नागरिकांचे वीज कार्यालयावर आंदोलन

या प्रकाराला कंटाळून आज गावकरी पप्पू अडकिणे, रावसाहेब अडकिणे, जनार्धन गावंडे, डिगांबर गावंडे, विजय गावंडे, मारोती पंडीत, उध्दव गावंडे, किशन अडकिणे, गोविंद गावंडे याच्यासह अनेक जणांनी साडे आकरा वाजता वीज कंपनीचे कार्यालय गाठले.

समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ठोकले कुलूप

संतप्त गावकऱ्यांनी वीज खंडीत प्रश्नी अभियंता जाधव यांच्याशी चर्चा केली. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त गावकऱ्यांनी वीज कंपनीच्या कार्यालयाला कुलुप ठोकले. यावेळी अभियंता जाधव व सुमारे १० कर्मचारी कार्यालयात होते.

दरम्यान, संबंधित घटनेची माहिती जाधव यांनी भ्रमणध्वनीवरून आखाडा बाळापूर पोलिसांना दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रविकांत हुंडेकर, जमादार भगवान वडकिले, प्रभाकर भोंग, नागोराव बाभळे यांनी डोंगरकडा येथे धाव घेतली.

त्यानंतर गावकरी व वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांमधे चर्चा घडवून आणली. दुपारी साडेतीन वाजता वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करणे व इतर कामे आठ ते पंधरा दिवसांत करण्याचे लेखी आश्‍वासन दिले.

विशेष म्हणजे त्यांचे लेखी आश्‍वासनही गावकऱ्यांनी खिडकीतूनच स्विकारले. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले.

कामे झाली नाही तर तीव्र आंदोलन

वीज पुरवठ्या सोबतच गावातील विजेचे खांब बदलणे, डोंगरकडा फाटा येथील वीज पुरवण्याचे फिडर वेगळे करणे या मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही कामे केली जात नव्हते. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले असल्याचे पप्पू अडकिणे यांनी सांगितले.

लेखी आश्‍वासनानंतर मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास या पेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल असे पप्पू अडकिणे यांनी सांगितले.

Back to top button