

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा : राज्यात दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी काय करता येईल? तसेच सहकारी साखर कारखान्यांच्या अडचणीबाबत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज (दि. ९) नर्सी नायगाव (जि. नांदेड) येथे शिष्टमंडळासोबत चर्चा केली. भारत जोडो यात्रेदरम्यान, गांधी यांनी हिंगोलीच्या शिष्टमंडळासोबत सुमारे ३५ मिनिट चर्चा केली.
यावेळी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, वसमतचे आमदार राजेश नवघरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आंबादास भोसले यांची उपस्थिती होती.
यावेळी राज्यातील सहकार क्षेत्रातील अडचणी व समस्या यावर चर्चा झाली. साखर संघ, दूध सहकारी संघ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कामकाज व त्यांच्यासमोरील अडचणी या विषयावरही चर्चा झाली. विशेषतः राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसमोरील ऊस गाळपाचे प्रश्न, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. राज्यात सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी काय उपाययोजना करणे अपेक्षित आहे, याची माहितीही त्यांनी जाणून घेतली. साखर कारखान्यांमधून उत्पादित झालेल्या साखरेचा दर, निर्यात धोरण याचीही माहिती घेतली. तसेच अर्बन बँकांचा नवीन कायदा, कायद्यातील तरतुदी, जीएसटी, इन्कम टॅक्स या विषयावरही चर्चा करण्यात आली.
हेही वाचलंत का ?