औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना ठाकरे गटाने बंडखोर आमदार प्रदीप जैस्वाल यांची महानगरप्रमुख पदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची महानगरप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. आता अडीच महिन्यानंतर तनवाणी यांना बढती देत त्यांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद पूर्व, पश्चिम आणि मध्य असे तीन विधानसभा मतदारसंघ हे त्यांचे कार्यक्षेत्र असणार आहे.
शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केले. त्यात औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचाही समावेश होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 6 ऑगस्ट रोजी प्रदीप जैस्वाल यांचे महानगरप्रमुख पद काढून घेत त्या जागी शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची त्या पदावर नियुक्ती केली होती.
किशनचंद तनवाणी हे 2014 साली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून भाजपमध्ये गेले होते, नंतर ते पुन्हा शिवसेनेत परतले. परंतु बराच काळ त्यांना कोणतेही पद देण्यात आले नव्हते. ते पक्ष कार्यापासून दूरच होते. आमदारांच्या बंडखोरीनंतर त्यांना महानगरप्रमुख पद मिळाले, परंतु त्यानंतरही तनवाणी नाराज असल्याचीच चर्चा होती, आता त्यांना बढती देत जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
हेही वाचा :